लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : विद्यापीठाच्या रोसेयो विभागातर्फे चाळीसगाव येथे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन शिबिर राबविण्यात येत असून, त्यातंर्गत वाकडी या पूरग्रस्त गावात रासेयो स्वयंसेवकांकडून पूरग्रस्तांना मदत कार्य सुरू आहे. त्यामुळे गावाची विस्कटलेली घडी पूर्वपदावर येत आहे.
यावेळी रासेयोचे स्वयंसेवक आपत्ती काळात संकटग्रस्तांना मानसिक आधार देत असून, आपल्यापरीने श्रमदान करून गावाची विस्कटलेल्या घडीला पूर्ववत करण्यात सहकार्य करीत आहेत. नदीकाठच्या घरांची झालेली पडझड, पुरात पत्र्यांचे वाहून गेलेले शेड, स्मशानभूमीची स्वच्छता, गरजूंना साडी, कपडे वाटप यासारखी कामे करण्यात येत आहेत. या स्वयंसेवकांना प्रभारी कुलगुरू ई. वायुनंदन, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. बी. व्ही. पवार, प्रभारी कुलसचिव डॉ. ए . बी. चौधरी, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील व विद्यापीठाचे व्यवस्थापन मंडळ यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच प्राचार्य डॉ. एस. आर. जाधव, रासेयो संचालक डॉ. पंकजकुमार नन्नवरे यांच्या नेतृत्वात शिबिर यशस्वीपणे सुरू आहे. शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. ए. एल. सूर्यवंशी, प्रा. डॉ. आर. पी. निकम, प्रा. मंगला सूर्यवंशी परिश्रम घेत आहेत. जळगाव जिल्हा समन्वयक डॉ. मनीष करंजे, पारोळा विभाग समन्वयक डॉ. जगदीश सोनवणे यांचेही सहकार्य लाभत आहे.