सरकारी वकील विद्या राजपूत खून खटल्याचा आज निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:17 AM2021-05-13T04:17:01+5:302021-05-13T04:17:01+5:30

१९ साक्षीदारांची तपासणी : चारित्र्यावरील संशयाने झाला होता खून जळगाव : जळगाव प्रथम वर्ग न्यायालयात सरकारी वकील म्हणून कार्यरत ...

Public Prosecutor Vidya Rajput murder case verdict today | सरकारी वकील विद्या राजपूत खून खटल्याचा आज निकाल

सरकारी वकील विद्या राजपूत खून खटल्याचा आज निकाल

googlenewsNext

१९ साक्षीदारांची तपासणी : चारित्र्यावरील संशयाने झाला होता खून

जळगाव : जळगाव प्रथम वर्ग न्यायालयात सरकारी वकील म्हणून कार्यरत असलेल्या रेखा ऊर्फ विद्या भरत राजपूत (३५, रा. सुपारीबाग, जामनेर) खून खटल्याचा निकाल गुरुवार १३ मे रोजी दिला जाणार आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश पी.वाय.लाडेकर यांच्या न्यायालयात हा खटला चालला. कोरोनाच्या अवघड परिस्थितीतही केवळ तीन महिन्यात खटल्याचे कामकाज संपविण्यात आले.

जळगाव प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात सरकारी वकील असलेल्या विद्या राजपूत यांचा उशीने तोंड व गळा दाबून खून झाला होता. पती डॉ. भरत लालसिंग पाटील व सासरे लालसिंग श्रीपत पाटील (७४, रा. बेलखेडे, ता. भुसावळ) या दोघांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. विद्या राजपूत यांचा मृत्यू झाल्यानंतर पती व सासरे या दोघांनी त्यांना जामनेर व नंतर भुसावळ येथील दवाखान्यात नेले होते. प्रत्येक ठिकाणी त्यांनी वेगवेगळी कारणे सांगितली होती. भुसावळ येथे मृत घोषित केल्यानंतर मृतदेह परस्पर बेलखेडे (ता. भुसावळ) या मूळगावी अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला होता. तेथे विद्या राजपूत यांचा मावस भाऊ गणेश सुरळकर व बहीण प्रिया सोळंखे यांनी मृत्यूचे कारण विचारले असता हृदयविकाराने झाल्याचे पतीने सांगितले होते, मात्र चेहरा पाहिल्यानंतर शरीरावर जखमा होत्या. प्रकरण संशयास्पद वाटल्याने विद्या यांच्या नातेवाईकांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची मागणी केली असता, त्यासही पतीने विरोध केला. त्यामुळे ही माहिती वरणगाव पोलिसांना कळविण्यात आली. त्यांनी प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करून मृतदेह वरणगाव रुग्णालयात नेला. तेथे पंचनामा करून मृतदेह जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी शवविच्छेदन झाल्यानंतर विद्या राजपूत यांचा मृत्यू गुदमरून तसेच तोंड व गळा दाबून झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला होता. त्यानुसार पती डॉ. भरत पाटील व सासरे लालसिंग पाटील यांना लागलीच अटक करण्यात आली होती, नंतर जामनेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

चारित्र्याच्या संशयाने घेतला बळी

विद्या राजपूत यांच्या चारित्र्यावर पतीकडून सतत संशय घेतला जात होता. त्या सतत मोबाईलवर बोलत असत. त्यामुळे त्यांच्यावर अधिक संशय घेऊन त्यांना मारहाण केली जात होती, असे चौकशीत समोर आले होते. साक्षीदारांची तपासणीदेखील हेच मुद्दे पुढे आले. सहकारी सरकारी वकील सुप्रिया क्षीरसागर यांच्याकडे त्यांनी मारहाणीची घटना कथन केली होती. त्याशिवाय नागपूर येथे प्रशिक्षणाला असताना पतीकडून होणाऱ्या छळाबाबत कैफियत मांडली होती. जळगाव येथील बिग बाजारात खरेदी केल्यानंतर पर्समध्ये एटीएम नव्हते. हे एटीएम पतीने काढून घेतल्याचे नंतर उघड झाले होते, असे क्षीरसागर यांनी आपल्या साक्षीत सांगितले आहे. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी बाजू मांडली, तर बचाव पक्षातर्फे एस.के. शिरुडे यांनी बाजू मांडली. दरम्यान, गुन्हा घडल्यापासून पती डॉ. भरत पाटील हा कारागृहातच आहे.

*यांच्या साक्षी ठरल्या महत्वपूर्ण*

या खटल्यात १९ साक्षीदारांची साक्षी नोंदविण्यात आल्या. त्यापैकी १४ साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत. त्यात फिर्यादी गणेश सुरळकर, ज्या डॉक्टरांकडे विद्या यांना उपचारासाठी नेण्यात आले ते डॉ. राहुल जावळे, डॉ. राजेश मानवतकर, चुलत भाऊ सूरज सरदारसिंग पाटील, ज्या वाहनातून त्यांना दवाखान्यात व नंतर अंत्यसंस्काराला नेण्यात आले त्याचा चालक विपुल गोपाल पटेल, मुलगा दुर्वेश ऊर्फ सोनू भरत पाटील, बहीण प्रिया प्रमोद सोळुंखे, शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल चंद्रकांत कळसकर, वरणगाव पोलीस ठाण्याच्या तत्कालीन प्रभारी अधिकारी सारिका कोडापे, जामनेर शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल चांदा, जळगाव न्यायालयातील सरकारी वकील सुप्रिया सुरेश क्षीरसागर, जामनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप इंगळे, शवविच्छेदन करणारे डॉ. नीलेश देवराज व जामनेरचे वकील ज्ञानेश्वर बाबुराव बोरसे आदींच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरलेल्या आहेत.

असा आहे घटनाक्रम

१३ जानेवारी २०१९ : वकील विद्या राजपूत यांचा खून

- १४ जानेवारी २०१९ : जामनेर पोलिसात गुन्हा दाखल

- १४ जानेवारी २०१९ : पती डॉ. भरत पाटील व सासरे लालसिंग श्रीपत पाटील यांना अटक

- ८ एप्रिल २०१९ : जामनेर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

- २४ एप्रिल २०१९ : जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र वर्ग

- ५ मार्च २०२० रोजी आरोपींवर दोषारोप ठेवला

२२ मार्च २०२० : कोविडमुळे खटल्याचे कामकाज बंद

१५ फेब्रुवारी २०२१: खटला सुरू

१६ मार्च २०२१ पर्यंत : १९ साक्षीदार तपासले

१३ मे २०२१ : खटल्याचा निकाल

Web Title: Public Prosecutor Vidya Rajput murder case verdict today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.