कुरंगी, ता. पाचोरा : कोरोना काळापासून बंद असलेला आठवडे बाजार लिलाव नुकताच कुरंगी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंचांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामस्थांच्या उपस्थितीत शांततेत झाला. मागील २०२० पासून कोरोना महामारीमुळे कुरंगी येथील आठवडे बाजार बंद असल्याने बाजार वसुली व लिलाव बंद होता.
कोरोनाचे नियम शिथिल झाल्याने कुरंगी ग्रामपंचायतमध्ये सरपंच मनीषा गणेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व सदस्य, ग्रामसेवक, ग्रामस्थांच्या उपस्थितीत लिलाव शांततेत पार पडला. हा लिलाव १२ सप्टेंबर २०१९ पासून तर ३१ मार्च २०२२ पर्यंत या सात महिन्यांसाठी लिलाव पंचवीस हजार रुपयात गावातील भगवान दयाराम पाटील यांनी शेवटची बोली बोलून देण्यात आला.
यावेळी सदस्य सीमा पाटील, मंगलाबाई पाटील, योगेश ठाकरे, अविनाश कोळी, ग्रामसेवक अविनाश पाटील यांच्या उपस्थितीत शांततेत पार पडला. या व्यतिरिक्त दररोज गावात येणारे विक्रेते व कापूस व्यापारी यांनाही ग्रामपंचायतीचा कर लावण्यात आला आहे.
रविवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात भाजीपाला दुकान १५ रुपये, मटन चिकन मासे डांगर टरबूज ३० रुपये, कापूस व्यापारी लहान गाडी ५० रुपये, मोठी गाडी १०० रुपये व गावात दररोज येणारे लहान मोठे विक्रेत्यांना १० रुपयेप्रमाणे कर लावण्यात आला आहे.