जळगावच्या सैन्य भरतीने देशातील रेकॉर्ड मोडले - कर्नल एस.एस.कालिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 20:55 IST2018-12-04T20:52:47+5:302018-12-04T20:55:21+5:30
अभियांत्रिकी व विज्ञान शाखेचे तरुणही भरतीत सहभागी

जळगावच्या सैन्य भरतीने देशातील रेकॉर्ड मोडले - कर्नल एस.एस.कालिया
सचिन देव
जळगाव : देशभरात वर्षभर कुठेना कुठे सैन्य भरती सुरुच असते. यामध्ये ८ ते १० जिल्हे मिळून होणाऱ्या भरतीत जास्तीत जास्त ३५ ते ४० हजार युवक सहभागी होत असतात. मात्र, जळगावच्या भरतीने देशभरात झालेल्या सैन्य भरतीचा रेकार्ड मोडला आहे. माझ्या २८ वर्षांच्या सेवेत पहिल्यादांच सैन्यात भरती होण्यासाठी येथील तरुणांची जिद्द व उत्साह पाहून मी भारावलो असल्याचे मत कर्नल. एस. एस. कालिया यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
विशेष म्हणजे बी.ई., बीएसस्सी सारख्या उच्चशिक्षित तरुणांनीदेखील या भरतीत मोठ्या संख्येने सहभाग घेतला असून, अनेक तरुण अंतीम परीक्षेपर्यंत पोहचले असल्याचेही कर्नल कालिया यांनी सांगितले.
या भरतीत जागेची मर्यादा नाही. जितक्या तरुणांनी भरतीसाठी नोंदणी केली आहे, तेवढ्या तरुणांना भरतीसाठी बोलावण्यात आले आहे. यामध्ये शारिरीक चाचणीसह, अंतिम परीक्षा जास्तीत जास्त गुणांनी उत्तीर्ण होणाºया युवकांनी देशसेवेची संधी मिळणार आहे. जीडी, सोल्जर, टेक्नीकल व इतर पदासांठी घेण्यात आलेल्या या भरतीत, प्रत्येक पदासाठी परीक्षेचे स्वरुप वेगवेगळे राहणार आहे. जीडीसाठी दहावी तरविविध टेक्नीकल पदासाठी १२ उत्तीर्णची अट असताना, त्या युवकांना त्यांच्या शिक्षणाच्या पात्रतेनुसार प्रश्न विचारला जाईल. भरतीसाठी तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने, दिवसा भरती घेणे अशक्य होते.
सैन्य भरतीत अनेकवेळा एजंटपैसे घेऊन युवकांना सैन्यात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवित असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे कोणी, पैसे देऊन नोकरीचे आमिष दाखवित असेल तर त्याने लगेच आमच्याशी संपर्क साधवा, त्याच्यावर तत्काळ कारवाई करणार असल्याचेही कर्नल. कालीया यांनी सांगितले.
धुळ्याची भरती झाली जळगावला
या भरतीत सर्वाधिक १५ हजार मुले जळगाव जिल्ह्यातील असल्याने, सैन्यात जाण्यासाठी येथील तरुणांमध्ये उत्साह आणि जिद्द दिसून आली. याचा खूप आनंद वाटला. भरतीसाठी आलेल्या ६० हजार युवकांपैकी निम्याहून अधिक युवक जळगाव, धुळे, नंदुरबारचेच दिसून आले. ही खरोखर अभिनानाची गोष्ट आहे.
ही भरती धुळ््याला घेण्याचे ठरवले होते. मात्र, तेथील जिल्हा प्रशासनातर्फे सहकार्य करण्यास असमर्थता दर्शविल्याने, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकरांशी आम्ही संपर्क साधला. त्यांनी मात्र लगेच सहकार्य केल्याने जळगावात सैन्य भरती घेण्यात आली.