तीन लाखापर्यंत पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना व्याज माफ; जळगाव जिल्हा बँकेचा निर्णय
By सुनील पाटील | Updated: March 15, 2024 19:19 IST2024-03-15T19:19:15+5:302024-03-15T19:19:36+5:30
या निर्णयामुळे ७२ कोटीचा बोजा पडणार

तीन लाखापर्यंत पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना व्याज माफ; जळगाव जिल्हा बँकेचा निर्णय
सुनील पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: ज्या शेतकऱ्यांनी मागील आर्थिक वर्षात अर्थात १ एप्रिल २०२३ पासून तीन लाख रुपये पीक कर्ज घेतले आहे, त्या शेतकऱ्यांना व्याज माफ करण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला आहे. १ लाख ९० हजार शेतकऱ्यांना १२ कोटी रुपयांचे कर्ज गेल्या वर्षी वाटप करण्यात आले आहे. त्यावरील व्याजाची रक्कम ७२ कोटी रुपये इतकी आहे. व्याजमाफिचा निर्णय घेणारी जळगाव जिल्हा बँक राज्यात पहिली असल्याचे चेअरमन संजय पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
ज्या शेतकऱ्यांना जिल्हा बँकानी मागील ३ लाखापर्यंत वर्षी पीक कर्ज वाटप केले होते, त्यांच्याकडलन व्याज वसूल करु नये असे केंद्र सरकारने स्पष्ट केले होते. मात्र नंतरच्या काळात पुन्हा एक आदेश काढून व्याजासहित कर्ज वसूल करण्याचे सांगितले. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार असल्याने यासंदर्भात आपण मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन यात तोडगा काढण्याची विनंती केली, त्यानंतर राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्वतंत्र जळगाव जिल्हा बँकेशी संबंधित सचिव व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतरही मार्ग निघाला नाही. सरकारकडून अपयश आले.
थकबाकीदारांना निर्णय लागू नाही
शेतकऱ्यांचे हित पाहता जळगाव जिल्हा बँकेने त्यांच्या पातळीवर व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला. हा लाभ ज्यांनी मागील वर्षी तीन लाखाचे कर्ज घेतले व ३१ ३१ मार्चपर्यंत कर्ज भरणाऱ्यांनाच मिळणार आहे. थकबाकीदारांसाठी हा निर्णय लागू होणार नसल्याचे संजय पवार यांनी स्पष्ट केले. जे शेतकरी नियमित कर्ज भरतील त्यांना चालू वर्षात वाढीव कर्ज दिले जाणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.