शेतातून सोबत घरी आले, एकत्र जेवले... पत्नीच्या मृत्यूनंतर अर्ध्या तासात पतीने प्राण सोडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 12:01 IST2021-03-27T04:17:20+5:302021-03-27T12:01:37+5:30
एकमेकांना सोडून कधीही न राहिलेल्या व एकमेकांना काय हवे नको याची काळजी घेणाऱ्या धरणगाव तालुक्यातील रोटवद येथील वृद्ध दाम्पत्याने सोबतच जगाचा निरोप घेतल्याची ह्रदयद्रावक घटना घ़डली.

शेतातून सोबत घरी आले, एकत्र जेवले... पत्नीच्या मृत्यूनंतर अर्ध्या तासात पतीने प्राण सोडले!
जळगाव : एकमेकांना सोडून कधीही न राहिलेल्या व एकमेकांना काय हवे नको याची काळजी घेणाऱ्या धरणगाव तालुक्यातील रोटवद येथील वृद्ध दाम्पत्याने सोबतच जगाचा निरोप घेतल्याची ह्रदयद्रावक घटना गुरुवारी रात्री घडली. लताबाई व नारायण झुंझारराव असे या दाम्पत्याचे नाव असून दोघांची अंत्ययात्राही सोबत निघाली. (Husband died after wife.)
लताबाई नारायण झुंझारराव (५५) व नारायण देवचंद झुंझारराव (६०) यांना मुले-बाळे नसल्याने दोघेही शेती करून उदरनिर्वाह करीत होते. नेहमीप्रमाणे गुरुवारी संध्याकाळी शेतातून सोबत आले व सोबतच जेवण केले. यात नारायण झुंझारराव हे बाहेर गेले असताना लताबाई या झोपल्या. घरी परतल्यानंतर नारायण यांनी पत्नीला उठविले असता त्या काहीच हालचाल करीत नव्हत्या. त्या वेळी त्यांनी पुतण्याला बोलविले व काही वेळातच ते चक्कर येऊन खाली कोसळले. त्यांना रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांनी जीव सोडला.
पत्नीला ह्रदयविकाराचा झटका येऊन त्यांचे निधन झाले आणि त्याच्या अर्ध्या तासाने पतीलाही दुःख अनावर झाल्याने त्यांनीही जगाचा निरोप घेतल्याच्या या घटनेने सर्वच जण हळहळले.
जळगावातील लताबाई यांचे भाचे मनोज बिढे यांच्यासह इतर नातेवाईकांना याची माहिती मिळताच सर्वांनी रोटवद येथे धाव घेतली. रात्री दोघांचीही सोबत अंत्ययात्रा निघून दोघांवर सोबतच अंत्यसंस्कार करण्यात आले. दोघांना पुतण्याने मुखाग्नी दिला.
पतीला सोडून कधीही राहिली नाही पत्नी
लताबाई या जळगावात आपल्या भाच्याकडे अथवा कोठेही नातेवाईकांकडे गेल्यानंतर त्या कधी कोणाकडे राहिल्या नाही. सकाळी आल्या की संध्याकाळी पतीच्या काळजीने त्या घरी परतत होत्या, असे मनोज बिढे यांनी सांगितले. त्यामुळे एकमेकांची एवढी काळजी घेणाऱ्या या दाम्पत्याने सोबतच जगाचा निरोप घेतला.