त्यांनी बागायती क्षेत्र घटविले अन् गावासाठी औदार्य दाखविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:20 IST2021-08-13T04:20:16+5:302021-08-13T04:20:16+5:30
कळमसरे, ता. अमळनेर : दानशूरपणा एकीकडे कमी होऊ लागला आहे, तर शेतकरी आत्महत्या करू लागला आहे; पण असा एक ...

त्यांनी बागायती क्षेत्र घटविले अन् गावासाठी औदार्य दाखविले
कळमसरे, ता. अमळनेर : दानशूरपणा एकीकडे कमी होऊ लागला आहे, तर शेतकरी आत्महत्या करू लागला आहे; पण असा एक शेतकरी आहे की, ज्याने बागायती क्षेत्र कमी करून गावासाठी पाणी वाटपाचा विडा उचलला आहे.
येथून जवळच असलेल्या वासरे गावाचे शेतकरी राजेंद्र शेणपडू पाटील यांनी स्वत:चे बागायती क्षेत्र घटवून शेतातील विहिरीचे पाणी टँकरद्वारे दररोज गावाला मोफत पुरविण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्यांना याकामी कळमसरेचे रामदेव शर्मा यांनी टँकर विनामूल्य वापरासाठी उपलब्ध करून दिलेले आहे.
एकेकाळी तीव्र पाणीटंचाई जाणवणाऱ्या वासरे ग्रामस्थांनी दोन वर्षापूर्वी पाडळसे धरणकामासाठी गौण खनिज पुरवून त्या मोबदल्यात गावी पाझर तलाव, नाला खोलीकरण, आदी जलसंधारणाची कामे करवून घेतल्याने गाव टँकरमुक्त झाले; परंतु क्षारअंश पाण्यामुळे पाणी पिण्यास बेचव जाणवू लागले. राजेंद्र पाटील यांचे सात भावांचे सहकार्य करणारे कुटुंब गावासाठी पुढे सरसावले. भावाभावांमध्ये आपापसात विचार-विनिमयाने राजेंद्र पाटील यांनी दरवर्षीपेक्षा यावर्षी एकूण क्षेत्रात बागायती पेरा कमी करून विहिरीचे शुद्ध पाणी पिण्यासाठी गावाला मोफत उपलब्ध करून दिले आहे.
ग्रामपंचायतीने केला अभिनंदनाचा ठराव
त्यांच्या या उपक्रमाचे सरपंच आशा भटू पाटील यांनी ग्रा. पं. ठरावाद्वारे अभिनंदन केले आहे. दोन महिन्यांपासून पाऊस नाही, जनावरांना चारा नाही. शेतकरी हवालदिल झालेला असताना राजेंद्र पाटील यांनी हमीचे बागायती क्षेत्र कमी पेरा करून, विहिरीचे पिण्याचे शुद्ध पाणी मोफत पुरवीत आहेत. हा त्यांचा गावासाठीचा त्याग आम्ही कधीही विसरणार नसल्याचे सरपंच आशाबाई पाटील, माजी सरपंच प्रवीण दयाराम पाटील, पांडुरंग रूपचंद पाटील, पोलीस पाटील यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
120821\12jal_5_12082021_12.jpg
वासरे येथे राजेंद्र शेणपडू पाटील हे टँकरद्वारे पिण्याचे पाणी वाटप करताना.