धरणगाव तालुक्यातील सोनवद येथे शाळेत जाऊ न दिल्याच्या संतापात मुलीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 00:45 IST2019-11-25T00:44:56+5:302019-11-25T00:45:59+5:30
शाळेत न जाऊ दिल्याच्या रागातून १६ वर्षीय शाळकरी मुलीने आत्महत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी सातला तालुक्यातील सोनवद येथे घडली.

धरणगाव तालुक्यातील सोनवद येथे शाळेत जाऊ न दिल्याच्या संतापात मुलीची आत्महत्या
धरणगाव, जि.जळगाव : शाळेत न जाऊ दिल्याच्या रागातून १६ वर्षीय शाळकरी मुलीने आत्महत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी सातला तालुक्यातील सोनवद येथे घडली. पूजा संतोष परदेशी असे या मुलीचे नाव आहे.
सूत्रांनुसार, तिचे वडील कपड्यांना लाँड्री करण्याचे काम करतात. घरात अठराविश्व दारिद्र्य असल्याने मोलमजुरी करून परिवाराला मुलीचा हातभार लागेल या हेतूने तिला शेतात पाठवित होते. त्यात तिची शाळा बुडत होती. सध्या कपाशी वेचण्याचे काम जोमाने सुरू असून मजूर मिळत नाही. त्यामुळे दोन पैसा घरात यावा या उद्देशाने तिला घरच्यांनी काही दिवस शेतात जा, असे सांगितल्याने तिला शाळा बुडत असल्याने राग आला. यातच रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पूजाने राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
मयत पूजाच्या पश्चात आई, वडील व चार बहिणी आहेत. मोठ्या बहिणीचे लग्न झालेले असून उर्वरित चौघी अविवाहीत आहेत. पूजाला धरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. सोमवारी सकाळी शवविच्छेदनानंतर तिच्यावर सोनवद येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहे. या घटनेसंदर्भात धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि पवन देसले हे करीत आहे.