लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या महामारीत डाॅक्टरांना देवदूत मानले जात असताना एखाद्या कुटुंबातील रुग्ण दगावल्यानंतर याच देवदूतांवर आरोपप्रत्यारोप केले जात आहे. डाॅक्टर व रुग्ण यांच्यातील परस्पर सबंधांमध्ये दरी निर्माण होऊन वादाच्या घटना होत आहे. कुटुंबातील सदस्य गेल्यानंतर दुख: सहाजिक असताना डाॅक्टरही देव नाही ही भावना समजून घ्यावी असा सार्वत्रिक सूर यानिमित्ताने व्यक्त होत आहे.
दरम्यान, अशा घटना घडल्यानंतर या प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्या अध्यखेतखाली एक समिती कार्यरत आहे. तोडफोड किंवा वाद टाळून आपल्या न्याय मागण्यासाठी या समितीकडे तक्रार नातेवाइकांना करता येत असते.
पाच मुख्य घटना अशा
१ गजाजन हार्ट हॉस्पिटलमध्ये रुग्णाला व्हेंटीलेटर न लावल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता.
२ सारा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत न झाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. यामुळे येथे गोंधळ झाला होता.
३ ऑर्किड हॉस्पिटलमध्ये आयसीयूत डॉक्टर, कर्मचारी उपस्थित नसल्याने रुग्णचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता.
४ निरामय रुग्णालयात रुग्णाकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांची प्रकृती खालावल्याचे नातेवाईकांचे म्हणणे होते. या रुग्णाला पुन्हा जीएमसीत दाखल करण्यात आले हेाते.
५ वेळेवर इंजेक्शन न दिल्याने व निष्काळजीपणामुळे तरूणाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी करीत रास्तारोको आंदेालन केले होते. डॉक्टरांवर कारवाई करा तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला होता.
असे असते समितीचे कार्य
डॉक्टरांबाबत रुग्णांच्या नातेवाईकांनी तक्रार दिल्यानंतर संबधित पोलीस ठाण्यातून जिल्हा शल्यचिकित्सक यांना एक पत्र दिले जाते. समितीमार्फत सर्व वैद्यकीय बाबी तपासणीचे त्यानंतर समिती त्यांचा अहवाल देत असते, या अहवालात डॉक्टर दोषी असतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जातो, अन्यथा नाही.
डॉक्टरांना समजून घ्या
ॲक्युट रेस्पीरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम अर्थात श्वास अचानक बंद होऊन मृत्यू होणे होय. यामुळे हे अचानक मृत्यू होत असल्याचे आरोप-प्रत्यारोपाचे प्रमाण वाढले आहे. शक्यतोवर व्हेंटीलेटरवर असलेल्या रुग्णांच्या बाबतीत हे होत आहे. अशा स्थितीत रुग्ण चांगला होता, जेवत होता, फोनवर बोलत होता, आणि अचानक कसा मृत्यू झाला असा प्रश्न नातेवाईकांकडून उपस्थित केला जातो. मात्र, ॲक्युट रेस्पीरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोममध्ये कधी मृत्यू होईल हे सांगता येत नाही. कोरोनाच्या उपचारांमध्ये मर्यादा आहेत. औषधांचा मर्यादीत वापर करावा लागतो, अन्यथा त्याचे दुष्परिणामही आहेतच. शिवाय आताच्या घडीला कोरोनावर रामबाण औषध नाही, अशा स्थितीत डॉक्टर त्यांचे पूर्ण प्रयत्न करीत आहेत. तेव्हा नातेवाईकांनी त्यांना समजून घेणे गरजेचे आहे.
- डॉ. धर्मेंद्र पाटील, माजी सचिव आयएमए
अतिदु:खात होणारे हे प्रकार
लोक हवालदिल झाले आहे. अनपेक्षित संकटे सर्वदूर येत आहेत. यात डॉक्टर जे व्हिलन ठरविले जात आहेत, ते अत्यंत दुदैैवी आहे. जवळची व्यक्ती जेव्हा जाते, त्यावेळी अतिदु:खात सारासार विचार करण्याची शक्ती नातेवाईकांना नसते, परिस्थितीचे विश्लेषण कसे करावे हे त्यांना कळत नाही, आणि भावनेच्या भरात या गोष्टी केल्या जातात. अशा परिस्थितीत जे झाले आहे चुकीचे झाले आहे. आणि त्याला कोणीतरी जबाबदार आहे. हे ठरवून डॉक्टरांना दोषी ठरविले जाते. मोकळ्या मनाने ते स्वीकारले जात नाही. म्हणून डॉक्टरांना दोष दिला जातो. मात्र, कोरोनाच्या या काळात डॉक्टर मोठ्या तणावात काम करीत आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना समजून घेणे आवश्यक आहे. रुग्णालयांनीही एक कॉन्सिलर ठेवून त्या माध्यमातून नातेवाईकांना परिस्थिती अवगत करणे गरजचे आहे.
- डॉ. प्रदीप जोशी, मानसोपचार तज्ञ