नशिराबादला ३४२० हेक्टर पिकांना नुकसानीचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 20:28 IST2019-11-18T20:26:38+5:302019-11-18T20:28:13+5:30
पंचनामे सादर : शेतकरी राजाला मदतीची अपेक्षा

नशिराबादला ३४२० हेक्टर पिकांना नुकसानीचा फटका
प्रसाद धर्माधिकारी
नशिराबाद- अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे नशिराबादसह परिसरातील शेतातल्या पिकांचे मोठे नुकसान झाले़ त्यानुसार सुमारे ३४२० हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांचे नुकसान झाल्याचे पंचनामा करण्यात आला आहे. यासंदर्भातला अहवाल शासन दरबारी देण्यात आला असल्याची माहिती तलाठी प्रवीण बेंडाळे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. रब्बीची पेरणी करण्यासाठी हातात पैसा नाही. आर्थिक नियोजन कोलमडले आहे. शासनाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहेत. मुख्यमंत्री पदावरून सुरु असलेल्या वाद विवाद व आडमुठेपणामुळे सर्वच राजकीय पक्षांनी सत्तेसाठी संघर्ष करीत आहेत़ मात्र या सर्व घडामोडींमध्ये शेतकरी राजाचा विसर पडला हे मात्र तितकेच खरे़ लवकर सत्ता स्थापन करा आणि शेतक?्यांना दिलासा द्या अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहे. अवकाळी पावसामुळे नशिराबाद सह परिसरात खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. ठराविक पिकांची पंचनामे होत असल्याची ओरड शेतकरी वर्ग करीत होता. मात्र नशिराबाद येथे कापूस, उडीद, सोयाबीन, पालेभाज्या ,ज्वारी मका, फळबागा आदी नुकसान बाधित पिकांचे सुमारे ३ हजार ४२० हेक्टर क्षेत्रफळपिकांचे नुकसान पंचनामे करण्यात आली असल्याची माहिती तलाठी बेंडाळे यांनी दिली. नशिराबाद परिसरात सर्वाधिक सोयाबीन पिकाचे नुकसान असल्याचे सांगण्यात येते. ग्राम विकास अधिकारी बी एस पाटील, कृषी सहाय्यक प्रवीण सोनवणे, तलाठी प्रवीण बेंडाळे यांनी पंचनाम्याचे काम केले.
पंचनामे झाले भरपाई कधी?
खरीप पिकांचे पंचनामे झालेत मात्र नुकसान भरपाई शासन देणार कधी या प्रतीक्षेत शेतकरी आहे. लवकर मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.