पावसाळ्याच्या शेवटच्या महिन्यात जलसाठ्याची ‘पन्नाशी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:20 IST2021-09-06T04:20:30+5:302021-09-06T04:20:30+5:30
जळगाव : पावसाळ्याच्या शेवटचा महिना उजाडला त्यावेळी जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमधील एकूण जलसाठ्याने पन्नाशी ओलांडली असून, रविवारी (दि. ५) हा ...

पावसाळ्याच्या शेवटच्या महिन्यात जलसाठ्याची ‘पन्नाशी’
जळगाव : पावसाळ्याच्या शेवटचा महिना उजाडला त्यावेळी जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमधील एकूण जलसाठ्याने पन्नाशी ओलांडली असून, रविवारी (दि. ५) हा साठा ५१.७५ टक्क्यांवर पोहोचला आहे. दिलासादायक बाब म्हणजे पावसाळा सुरू झाल्यापासून घट होत गेलेल्या वाघूर धरणसाठ्यातही गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे वाढ होऊन धरणसाठा ६९.९२ टक्क्यांवर पोहोचला आहे. गिरणा धरणसाठाही ४७.३० टक्क्यांवर पोहोचला आहे.
यंदा सलग पाऊस नसल्याने मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये किरकोळ चढ-उतार होत गेला. जून महिन्याच्या सुरुवातीला प्रकल्पांमध्ये ३२.७३ टक्के जलसाठा होता. तो ७ ऑगस्टपर्यंत केवळ ३६.०६ टक्क्यांवर पोहोचला. दोन महिन्यांत केवळ ३.३३ टक्के वाढ होऊ शकलेल्या जलसाठ्यात मात्र आता ७ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान थेट १५.६९ टक्क्यांनी वाढ होऊन जिल्ह्यातील एकूण जलसाठा ५१.७५ टक्क्यांवर पोहोचला आहे.
चार दिवसांत ‘वाघूर’मध्ये सात टक्क्यांहून अधिक वाढ
जळगाव व जामनेर तालुक्यांची तहान भागविणाऱ्या वाघूर धरण साठ्यात पावसाळा सुरू झाल्यानंतर वाढ होण्याऐवजी उलट घट होत गेली होती. त्यामुळे ६५.०८ टक्क्यांवरून धरणसाठा ७ ऑगस्टपर्यंत ६२.१७ टक्क्यांवर आला होता. मात्र, गेल्या चार दिवसांतच या धरणसाठ्यात ७.६६ टक्क्यांनी वाढ झाली व धरणसाठा ६९.९२ टक्क्यांवर पोहोचला आहे. वाघूर धरण क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने धरणसाठ्यात चांगली आवक सुरू झाली आहे. १ सप्टेंबर रोजी या धरणात ६२.६६ टक्के जलसाठा होता तो दररोज वाढत गेला व आता ७० टक्क्यांच्या जवळ पोहोचला आहे. यंदा ६९.९२ टक्क्यांपर्यंत वाघूर धरणाचा साठा पोहोचला असला तरी गेल्या वर्षी याच दिवशी हे धरण १०० टक्के भरले होते. यंदा मात्र पावसाळ्याचा शेवटचा महिना उजाडला तरी ते ३० टक्क्यांनी खालीच आहे.