एरंडोल : अंजनी धरणातील जलाशयात यंदाच्या पावसाळ्यात पाणीसाठा वाढला नाही. त्यामुळे सध्य:स्थितीत असलेल्या पाणी साठ्याचे बाष्पीभवन व लॉसेस यांचा विचार केला असता डिसेंबरअखेर पुरेल अशी स्थिती आहे. त्यामुळे २०१९ हे नवीन वर्ष शहरावर तीव्र पाणी संकट घेऊन येणार की काय अशी चिंता व्यक्त केली जाते.यावर्षी गिरणा धरणात ४८ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे सिंचन आवर्तन सुटण्याची शक्यता नाही. गेल्या वर्षी जामदा कालव्याचे पाणी पारोळा तालुक्यातील धोत्रा एस्केपद्वारे सोडून अंजनी धरणाचे ३५ दलघफू इतक्या पाण्याने पुनर्भरण करण्यात आले होते. पण यंदा सिंचन आवर्तनच बसत नसल्यामुळे अंजनीचे जलाशयात पाणी भरले जाऊ शकत नाही.त्यामुळे एरंडोल शहराला भर उन्हाळ्यात पाणीपुरवठा करण्यासंदर्भात एकमेव पर्याय गिरणा नदीच्या पाण्याचा शिल्लक आहे. गिरणा नदी काठावरील गावांचे पाणीप्रश्नी गिरणा नदीला पाणी सोडण्यात येणार आहे, असे संकेत मिळाले आहेत. एकूण पाच आवर्तने प्रस्तावित असून पहिले आवर्तन नोव्हेंबर महिन्यात सोडण्यात येईल असे समजतो.या बिगर सिंचन पाण्याचे आवर्तन दहिगाव बंधाऱ्यावरील कालव्याला नागदुलीपर्यंत सोडल्यास तेथे कालव्याला बांध करून पाणी अडवणे शक्य होईल व एरंडोल शहराला पाईप लाईनद्वारे पाणीपुरवठा करणे शक्य आहे.या पर्यायी व्यवस्थेसाठी नगरपालिका प्रशासनाने योग्य ती कार्यवाही आतापासून करावी, अशी मागणी आहे. या वर्षात पाण्याचे सिंचनासाठी एकही गिरणेचे आवर्तन नाही. त्यामुळे अंजनी धरणाचे पुनर्भरणही नाही. सारी मदार गिरणा नदीला सोडण्यात येणाºया आवर्तनावरच आहे. गिरणा नदीचे आवर्तनामुळे एरंडोल शहराला दिलासा मिळणार आहे.
एरंडोलवर भीषण पाणीटंचाईचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 15:40 IST
अंजनी धरणातील जलाशयात यंदाच्या पावसाळ्यात पाणीसाठा वाढला नाही. त्यामुळे सध्य:स्थितीत असलेल्या पाणी साठ्याचे बाष्पीभवन व लॉसेस यांचा विचार केला असता डिसेंबरअखेर पुरेल अशी स्थिती आहे.
एरंडोलवर भीषण पाणीटंचाईचे सावट
ठळक मुद्देनवीन वर्षात एरंडोल शहरावर जलसंकटअंजनी धरणात डिसेंबरपर्यंतचा जलसाठागिरणा धरणात केवळ ४८ टक्के जलसाठा