मुक्ताईनगर : ई-पीक पाहणी प्रकल्पाकडे शेतकऱ्यांनी सकारात्मकपणे पाहणे गरजेचे आहे. या अभियानात त्वरित सहभागी व्हावे. ई-पीक पाहणी अभियानास ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली असल्याची माहिती प्रभारी तहसीलदार डॉ. निकेतन वाळे यांनी दिली.
शेतजमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद करण्याची पद्धत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होते. या पीक नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांना पीक कर्जही दिले जाते. मात्र, दोन-तीन गावांमध्ये मिळून एकच तलाठी असल्याने पीक पाहणी अचूक नोंदवली जात नाही, असा शेतकऱ्यांचा कायम आक्षेप होता. ही बाब लक्षात घेत आता महसूल विभागाने आपल्या पिकांची रिअल टाइम नोंदणी करण्याची सुविधा थेट शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे. महसूल विभागाने यासाठी स्वतंत्र मोबाइल ॲप्लिकेशन निर्मिती केली आहे. हा ई-पीक पाहणी प्रकल्प १५ ऑगस्टपासून राज्यभर राबवण्यात येत आहे.
टाटा ट्रस्टच्या साहाय्याने या ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. या मोबाइल ॲप्लिकेशनमध्ये शेतकरी पिकांची माहिती भरतील. तलाठी या पिकांच्या नोंदी तपासून घेतील. यामुळे पीक पेरणीची रियल टाइम माहिती ॲप्लिकेशनमध्ये संकलित होणार आहे. तसेच ही माहिती संकलित होताना पारदर्शकता येणार आहे. पीक पाहणी नोंदणीमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढवल्यामुळे पीक विमा आणि पीक पाहणीचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होईल, असे सांगण्यात आले.