वीज पुरवठा खंडीत केल्याने जळगावातील ७८ गावांचा पाणी पुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 16:34 IST2018-02-16T16:22:32+5:302018-02-16T16:34:25+5:30
सामूहिक योजनांचा वीज पुरवठा खंडित केल्याने नागरिकांचे हाल

वीज पुरवठा खंडीत केल्याने जळगावातील ७८ गावांचा पाणी पुरवठा बंद
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.१६- वीज बिलांच्या थकबाकीमुळे विद्युत पुरवठा खंडित केल्याने जिल्ह्यातील सामूहिक पाणी पुरवठा योजनेतील ७८ गावांचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. यामुळे या सर्वच गावातील नागरिकांचे हाल होत आहेत.
विविध ठिकाणच्या पाणी योजनेची वीज बिलांची थकबाकी एकूण ८ कोटी ६० लाख ७२ इतकी झाली आहे. याबाबत वीज वितरण विभागाने वारंवार कळवूनही वीज बिले न भरल्याने शेवटी जवळपास गेल्या महिनाभरापासून या विविध ठिकाणचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आल्याने पाणी पुरवठा बंद पडला आहे.
जामनेर तालुक्यातील तोंडापूर पाणी योजनेत १७ गावे असून सुमारे १४ लाखांवर थकबाकी आहे. याचप्रमाणे चाळीसगाव तालुक्यातील कळमडू पाणी योजनेत ३ गावे असून ८ लाख ७५ हजार थकबाकी झाली आहे. आडगाव ता. एरंडोल योजनेत १६ गावांचा समावेश असून २८ लाख बाकी आहे. तर भुसावळ, मुक्ताईनगर व बोदवड या ८० गाव पाणी योजनेत ३४ गावे असून २ कोटी ९५ लाख रुपये थकबाकी आहे. वरणगाव ता. भुसावळ योजनेची १७ लाख थकबाकी झाली असून ५ गावांना फटका बसला आहे.