डॉक्टर मुलीशी प्रेमविवाह केला, कुटुंबाला संपविण्याच्या धमकीने तरुणाने जीव दिला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:19 IST2021-07-14T04:19:21+5:302021-07-14T04:19:21+5:30
जळगाव : मामाच्या शेजारी राहणाऱ्या डॉक्टर मुलीशी ओळखीतून सूत जुळले... त्यातून प्रेम बहरले... त्यानंतर व्हॅलेंटाईन डे अर्थात १४ ...

डॉक्टर मुलीशी प्रेमविवाह केला, कुटुंबाला संपविण्याच्या धमकीने तरुणाने जीव दिला!
जळगाव : मामाच्या शेजारी राहणाऱ्या डॉक्टर मुलीशी ओळखीतून सूत जुळले... त्यातून प्रेम बहरले... त्यानंतर व्हॅलेंटाईन डे अर्थात १४ फेब्रुवारीला तिच्याशी नोंदणी पद्धतीने विवाह केला. या प्रकरणाची वाच्यता झाल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी मामा व तरुणाच्या कुटुंबीयांना संपविण्याची धमकी दिली. मध्यप्रदेशातील रतलाम येथे घडलेल्या या प्रकरणानंतर तरुणाने भीतीमुळे थेट जळगाव गाठून विष प्राशन केले. २४ तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर मंगळवारी दुपारी १२.३० वाजता त्याची प्राणज्योत मालवली. चिराग बाबूलाल पांडे (वय २८, रा. शिवाजीनगर), असे या तरुणाचे नाव आहे.
चिराग याचे मामा हरीश पुरोहित यांनी या घटनेबाबत जिल्हा रुग्णालयात माध्यमांना माहिती दिली. चिराग हा गेल्या दहा वर्षांपासून मध्यप्रदेश राज्यातील रतलाम येथे मोबाइल कंपनीत उच्च पदावर कामाला होता. तेथे मामा हेमंत पुरोहित यांच्याकडेच तो वास्तव्यास होता. आई, वडील, तसेच लहान भाऊ हे शिवाजीनगर येथे वास्तव्यास आहेत. वडील दाणाबाजारात एका दुकानावर कामाला आहेत. रतलाम येथे मामाच्या घराशेजारी राहणाऱ्या डॉक्टर असलेल्या तरुणीशी चिरागची आठ वर्षांपासून मैत्री होती. त्यातून दोघांमध्ये सूत जुळले. प्रेम प्रकरण सुरू झाल्यानंतर १४ फेब्रुवारी २०२१ रोजी दोघांनी रतलाम येथे नोंदणी कार्यालयात जाऊन विवाह विवाह केला. विवाहानंतर तरुणी तिच्याच घरी राहत होती. चिराग हा मामाच्या घरी राहत होता. मुलीच्या घरच्यांचा विरोध होईल या भीतीने दोघेही पळून जाण्याच्या विचारात होते. मात्र, चिराग याचे मामा तसेच कुटुंबीयांनी त्याला विरोध केला.
प्रेमविवाहास परवानगीऐवजी दिली धमकी
प्रेमविवाह किती दिवस लपवून ठेवणार म्हणून चिरागचे मामा, आई अनिता, मावशी व इतर कुटुंबीयांनी १० जुलै रोजी मुलीच्या घरी जाऊन झाले गेले विसरून जा... दोघांनी प्रेमविवाह केला आहे. त्यास तुम्ही आनंदाने परवानगी द्या म्हणून विनंती केली. तेथे त्यांच्याकडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर कुटुंबीय घरी निघून आले. दुसऱ्या दिवशी ११ जुलै रोजी मुलीचे वडील व भावाच्या मित्रांनी चिरागच्या मामाचे घर गाठले. दोघांच्या या विवाहाला आम्ही मानत नाही. यापुढे मुलीला मेसेज अथवा फोन करायचा नाही, तसेच तिच्याशी कुठलाच संबंध ठेवायचा नाही; अन्यथा तुम्हा सर्वांना घराबाहेर निघणे अवघड करू, इतकेच नाही, तर चिरागसह सर्व कुटुंबीयांना जिवे ठार करण्याची धमकी दिली.
विष प्राशन करण्यापूर्वी बहिणीशी संपर्क
प्रेमभंगही झाला व कुटुंबीयांसह आपलाही जीव जाण्याची भीती वाटल्यामुळे चिराग घाबरला. आई व भाऊ यांना रतलामलाच सोडून चिराग १२ जुलै रोजी जळगावात आला. वडील दुकानावर गेलेले होते. शिवाजीनगर येथील घरी कुणीही नसल्याने दुपारी १ वाजता चिरागने विष प्राशन केले. विष प्राशन केल्यावर बहीण पायल हिला फोन केला, बहिणीला शंका आल्याने तिने मावशीचा मुलगा निर्मल याला शिवाजीनगरात पाठविले. त्याने दरवाजा दरवाजा तोडला. यावेळी चिराग घरात पडलेला होता, तर त्याच्या शेजारी विषाची बाटली होती. निर्मलने तत्काळ त्याला जिल्हा रुग्णालयात हलविले. प्रकृती गंभीर असल्याने खासगी रुग्णालयात हलविले. उपचार सुरू असताना मंगळवारी दुपारी १२.३० वाजता चिरागची प्राणज्योत मालवली. चिरागच्या मृत्यूस डॉक्टर मुलीचे कुटुंब व तिच्या भावाचे मित्र कारणीभूत असल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी हेमंत पुरोहित यांनी केली.