बोगस ज्वारी बियाण्याचा प्रश्नावर कृषिमंत्री व प्रधान सचिव यांच्याशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 16:55 IST2021-03-18T16:54:22+5:302021-03-18T16:55:23+5:30
शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीसंदर्भात आमदार मंगेश चव्हाण यांनी कृषिमंत्री, प्रधान सचिव व राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

बोगस ज्वारी बियाण्याचा प्रश्नावर कृषिमंत्री व प्रधान सचिव यांच्याशी चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : बोगस बियाण्यांमुळे चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीसंदर्भात आमदार मंगेश चव्हाण यांनी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले व राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक राजेंद्र सिंह यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
संबंधित हायटेक कंपनीच्या ३२०६ या ज्वारी वाणाच्या कणसांना दाणेच न आल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याने कंपनीवर गुन्हा दाखल करून शेतकऱ्यांच्या झालेल्या कोट्यवधीच्या नुकसानाची भरपाई मिळावी अशी मागणी आमदार चव्हाण यांनी केली. यावेळी माजी आमदार तथा कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल, भाजपा शहर सरचिटणीस जितेंद्र वाघ आदी उपस्थित होते.
याबाबत कृषीमंत्री दादा भुसे यांनी तात्काळ राज्याचे गुणनियंत्रक संचालक यांना चौकशीचे आदेश देऊन सबंधित कंपनीवर कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले तर कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी ही देखील या प्रकरणात स्वतः वैयक्तिक लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केवळ सहानुभूती न दाखवता एक शेतकऱ्याचा मुलगा या नात्याने शेतकऱ्यांना फसवणाऱ्या बोगस बियाणे कंपनी विरोधात थेट मंत्रालयाचा दरवाजा आमदार मंगेश चव्हाण यांनी ठोठावल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.