"ठाणे एलिव्हेटेड रोड टनेल प्रकल्पात ३ हजार कोटींचा भ्रष्टाचार, मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेचा राजीनामा घ्यावा", संजय राऊतांची मागणी
By सुनील पाटील | Updated: May 31, 2025 14:31 IST2025-05-31T14:31:25+5:302025-05-31T14:31:52+5:30
Sanjay Raut News: मेघा इंजीनियरिंग नावाच्या कंपनीने भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला शेकडो कोटींचा निधी दिला असून, याच पैशातून आमदार-खासदारांसाठी मते आणि यंत्रणा विकत घेण्यात आल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी शनिवारी जळगावात पत्रकार परिषदेत केला.

"ठाणे एलिव्हेटेड रोड टनेल प्रकल्पात ३ हजार कोटींचा भ्रष्टाचार, मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेचा राजीनामा घ्यावा", संजय राऊतांची मागणी
- सुनील पाटील
जळगाव - ठाणे एलिव्हेटेड रोड टनेल प्रकल्पातून ३ हजार कोटी रुपये संबंधित खात्याचा मंत्री मिळवतो ही महाराष्ट्र राज्याची लूट आहे. अशा हजारो कोटीतून मागील विधानसभेची निवडणूक लढली गेली. मेघा इंजीनियरिंग नावाच्या कंपनीने भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला शेकडो कोटींचा निधी दिला असून, याच पैशातून आमदार-खासदारांसाठी मते आणि यंत्रणा विकत घेण्यात आल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी शनिवारी जळगावात पत्रकार परिषदेत केला.
१४ हजार कोटी रुपयांचे टनेल प्रकल्प या कंपनीला देण्याचा घाट घातला होता, मात्र दुसऱ्या कंपनीने सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केल्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले पाहिजेत, असे राऊत म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्या भ्रष्टाचाराचा मुखवटा टरटर फाडून टाकला आहे, असे म्हणत, राज्यात चालणारा भ्रष्टाचार सर्वोच्च न्यायालयाने देशासमोर आणल्याचे त्यांनी नमूद केले. संबंधित खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा मागायला हवा, अशी मागणीही त्यांनी केली.
मंत्रीमंडळ नव्हे, 'देवेंद्र मध्यवर्ती कारागृह'
देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकायला तयार नाहीत, म्हणूनच 'सामना'च्या अग्रलेखातून 'देवेंद्र मध्यवर्ती कारागृह' या माध्यमातून विस्तृत लेखन केले आहे, असे खासदार राऊत यांनी सांगितले. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात तुरुंगात जायला पाहिजे असे सर्व लोक आहेत.त्यामुळे त्यांनी आपल्या मंत्रिमंडळाचे नामांतर देवेंद्र मध्यवर्ती कारागृह करत मंत्रिमंडळाला कारागृहाचा दर्जा दिला पाहिजे, अशी उपरोधिक टीकाही राऊत यांनी केली.
दोन्ही पवार एकत्रच्या चर्चा हवेतील
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याबाबतच्या चर्चा सध्या हवेत आहेत. शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांचा वारसा घेऊन पुढे चालले असून, त्यांचा पक्ष फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित झालेला आहे. त्यामुळे त्यांच्यासारखा आदर्श नेता धर्मांध आणि जातीय शक्तींबरोबर एकत्र येईल, असे त्यांच्या समर्थकांना आणि सहकाऱ्यांना वाटत नाही, असे राऊत यांनी सांगितले.
कर्जमाफीवर तिन्ही पक्षांचे हातवर
शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्जमाफी करण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते, मात्र आता हे तीनही पक्ष हात वर करत आहेत, असा आरोप राऊत यांनी केला. त्यांनी देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे काही प्रमुख नेते आणि एकनाथ शिंदे यांचा उल्लेख करत, खोटेपणाचा लाभ तुम्हीही घेतलेला आहे त्यामुळे तुम्हाला यावर भूमिका घ्यावी लागेल, असे म्हटले. महिलांना २१०० रुपये देण्याची घोषणाही कागदावरच असून, आता ५०० रुपयांपर्यंत आले आहेत, अशी टीका त्यांनी केली. ईव्हीएम आणि सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून सत्ताधाऱ्यांनी विजय मिळवला असल्याचा आरोपही त्यांनी केला.
आम्ही अनिल गोटेंच्या पाठीशीच
धुळे शासकीय विश्रामगृहातील प्रकरणात आपण अनिल गोटे यांच्या पाठीशीच आहोत. अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांना नजराणा देण्यासाठी ही रक्कम होती आणि खोतकर हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे आहेत. दोन कोटीच्या आसपास रक्कम त्यांच्या पीए जवळ सापडली असून, १५ कोटींचा हिशोब होता आणि १० कोटी त्यांच्या जालन्याच्या घरी जमा करायचे होते असा दावा राऊत यांनी केला. भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकू असं सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाबाबत काय केलं? कुणावर गुन्हे दाखल केले? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. एसआयटीची स्थापना केली, मात्र त्याचे सदस्य कोण आहेत याची माहिती दिली आहे का, असेही त्यांनी विचारले. लोकांना फसवण्याचे धंदे त्यांनी बंद केले पाहिजे.