चाळीसगाव पालिकेच्या ‘शताब्दी’चा पडला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 06:46 PM2018-10-21T18:46:58+5:302018-10-21T18:48:53+5:30

निनादणारे सनईचे मंगलस्वर... आंब्याच्या पानांचे तोरण... फुलांची सजावट... शहरातून निघालेली भव्य शोभायात्रा... एखाद्या शताब्दी महोत्सवाची सुरुवात अशी होते. तथापि, चाळीसगाव नगरपालिका प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे या ऐतिहासिक क्षणांना मुकली आहे. शुक्रवारी पालिकेने शताब्दी वर्षात पदार्पण करूनही त्याचे साधे उद्घाटनही होऊ शकले नाही. नगराध्यक्षांसह नगरसेवकांच्या अनास्थेविषयी शहरात नाराजीचा सूर उमटला आहे.

The Chalisgaon municipality's 'Centenary' fell down | चाळीसगाव पालिकेच्या ‘शताब्दी’चा पडला विसर

चाळीसगाव पालिकेच्या ‘शताब्दी’चा पडला विसर

googlenewsNext
ठळक मुद्देपालिका प्रशासन उदासिन, सर्व स्तरातून व्यक्त झाली नाराजीसत्ताधारी म्हणतात, समिती गठित करणारविरोधी गट म्हणतात, सुविधांबाबत जनतेचा भ्रमनिरास

जिजाबराव वाघ
चाळीसगाव, जि.जळगाव : निनादणारे सनईचे मंगलस्वर... आंब्याच्या पानांचे तोरण... फुलांची सजावट... शहरातून निघालेली भव्य शोभायात्रा... एखाद्या शताब्दी महोत्सवाची सुरुवात अशी होते. तथापि, चाळीसगाव नगरपालिका प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे या ऐतिहासिक क्षणांना मुकली आहे. शुक्रवारी पालिकेने शताब्दी वर्षात पदार्पण करूनही त्याचे साधे उद्घाटनही होऊ शकले नाही. नगराध्यक्षांसह नगरसेवकांच्या अनास्थेविषयी शहरात नाराजीचा सूर उमटला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था असणारी नगरपालिका कोणत्याही शहराचा आत्मा असते. चालता-बोलता इतिहास म्हणूनदेखील तिच्याकडे पाहिले जाते. शहराच्या जडणघडणीची ती मुख्य साक्षीदार असते. थेट ब्रिटिश कालखंडात सुरू झालेली चाळीसगाव पालिका म्हणून वेगळी ठरते. उत्तर महाराष्ट्रात लौकिक मिळविणाऱ्या याच पालिकेने ९९ वर्षांचा टप्पा पार करुन शताब्दी वर्षात पदार्पण केले आहे. शताब्दी महोत्सवही थाटात सुरू होणे अपेक्षित होते. मात्र प्रशासनासह शहराचा गाडा हाकणारे नगराध्यक्ष, नगरसेवक आणि यांच्यात दुवा म्हणून भूमिका बजावणारे मुख्याधिकारी यांना शताब्दी महोत्सवाचा विसर पडलेला पाहून नागरिकांसह विविध स्तरातील महानुभावांनी तीव्र नापसंती दर्शवली आहे.
हेचि फळ का मम तपाला?
१९ आॅक्टोबर १९१९ रोजी चाळीसगाव पालिकेचा कारभार लोकनियुक्त पदाधिकारी पाहू लागले. त्यामुळे यंदाचे २०१८ हे वर्ष पालिकेचे शताब्दी वर्ष ठरते. पुढील वर्षी शताब्दी वर्षाची सांगता होईल. शुक्रवारी म्हणूनच शताब्दी महोत्सवाचे दीपप्रज्वालन होऊन नमनाची सनई निनादणे आवश्यक होते. महोत्सवाच्या तयारीबाबतही पालिकेचे नियोजन नसल्याची बाब उघड झाली आहे. पालिका शताब्दीत पदार्पण करीत असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले नाही, अशी खंत काही नगरसेवकांनी ‘लोकमत’शी बोलतांना मांडली.
चाळीसगाव पालिका नाबाद १००
चाळीसगाव शहराचा कारभार (१९०७ ते १९१९ ) असा १२ वर्षे 'नोटीफाईड कमिटीने' पाहिल्यानंतर १२ एप्रिल १९१९ रोजी म्युनिसिपल अ‍ॅक्टनुसार पालिका अस्तित्वात आली. १ आॅगस्ट १९१९ रोजी आठ जागांसाठी पहिली निवडणूक झाली. यात १९ जण रिंगणात होते. १९ आॅक्टोबर १९१९ रोजी लोकनियुक्त प्रतिनिधींनी पालिकेचा कारभार पाहण्यास सुरुवात केली. पहिले नगराध्यक्ष म्हणून नगरशेट नारायण बंकट बुंदेलखंडी यांची निवड झाली. यंदाचे हे पालिकेचे शताब्दी वर्ष असून, शुक्रवारी त्याला सुरुवात झाली आहे. २०१९ मध्ये शताब्दीची सांगता होईल. गेल्या १०० वर्षांचा हा पालिकेचा प्रवास आहे. तो आजच्या आॅनलाइन पिढीलाही ज्ञात होणे गरजेचे आहे. शताब्दी महोत्सवात याचे सिंहावलोकन होऊ शकते.

दोन दिवसात बैठक घेणार
चाळीसगाव पालिकेने शताब्दी वर्षात पदार्पण केले, ही भूषणावह बाब असून, नियोजनासाठी येत्या दोन दिवसात बैठक घेण्यात येणार आहे. सर्व नगरसेवक व विविध क्षेत्रातील जाणकारांची एक समिती गठित केली जाईल. आमदार उन्मेष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महोत्सव साजरा केला जाणार आहे. - आशालता चव्हाण, नगराध्यक्षा, न.पा.चाळीसगाव.

सगळाच आनंदी आनंद
चाळीसगाव पालिकेने राज्यभर नावलौकिक मिळविला आहे. मात्र गेल्या दोन वर्षात याला आहोटी लागली आहे. सर्वत्र उदासिनता असून, जाहिरातबाजीला ऊत आला आहे. जनतेची कामे मार्गी लागत नाही. सोयी-सुविधांबाबत जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. शताब्दी महोत्सवाचा विसर पडणे हे याचे स्पष्ट उदाहरण आहे.
-राजीव देशमुख, गटनेते शविआ, चाळीसगाव पालिका.

नियोजन करू
गेल्या ३५ वर्षांपासून नगरसेवक म्हणून काम करतोयं. विद्यमान सभागृहातील ज्येष्ठ नगरसेवकही आहे. शताब्दी महोत्सवाबाबत प्रशासनाने कळविले नाही. नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन नियोजन करू.
नागरिकांच्या प्रताक्रिया, आशा तसेच अपेक्षाही जाणून घेण्यात येतील.
-राजेंद्र चौधरी, गटनेते भाजपा, चाळीसगाव न.पा.

विविध कार्यक्रम घ्यावे
चाळीसगाव पालिकेला शतकी परंपरा आहे. यामुळे शताब्दी महोत्सव साजरा होणे क्रमप्राप्त ठरते. यासाठी विविध कार्यक्रम घेण्यात यावे. वेगवेगळे संकल्प करुन सोयी - सुविधा शेवटच्या घटकापर्यंत पोहचल्या पाहिजेत. शताब्दी सोहळ्यात नागरिकांना सहभागी केले पाहिजे. नागरी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी.
-लीलावती पाटील, माजी नगराध्यक्षा, चाळीसगाव.
खंत वाटते
पाया भक्कम असेल तरच एखादी संस्था शताब्दीत पाऊल ठेवते. चाळीसगाव पालिकेला वैभवशाली इतिहास असून तिच्या शताब्दी महोत्सवाचा कोणताही मागसूम दिसत नाही याची खंत वाटते. स्थापनेपासून आमच्या कुटुंंबाने पालिकेसाठी मोठे योगदान दिले आहे. शहरात नागरी सुविधा पुरविण्याची चांगली परंपरा पालिकेने जपली आहे. तथापि, गेल्या काही वर्षात याला छेद गेला आहे. - प्रदीप देशमुख, अध्यक्ष, व्यापारी महामंडळ, चाळीसगाव.
अभिमानाची बाब
लोकसहभाग वाढविण्यासाठी शताब्दी महोत्सवाचा चांगला उपयोग होऊ शकतो. मात्र याचा विसर पडल्याचे पाहून वाईट वाटले. गेल्या शंभर वषार्तील स्मृती जागविणारा सोहळा घडवून आणणे. ही पालिकेची जबाबदारीच आहे. यामुळे सामाजिक जिव्हाळा वाढीस लागण्यास मदत होईल. 'प्रभाग मेळावे' असे उपक्रमही यानिमित्ताने घेता येतील.
-डॉ.मुकूंद करंबेळकर, अध्यक्ष, रंगगंध कलासक्त न्यास, चाळीसगाव.





 

Web Title: The Chalisgaon municipality's 'Centenary' fell down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.