राजवडजवळ भर रस्त्यावर दि बर्निंग ट्रकचा थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 20:44 IST2020-02-01T20:44:01+5:302020-02-01T20:44:56+5:30
राजवड, ता.पारोळा येथे भर रस्त्यावर बिलखेडा येथून चारा भरुन भामरे, ता.चाळीसगाव येथे जात असलेल्या ट्रकला विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने लागलेल्या आगीचा थरार तब्बल दोन तास चालला.

राजवडजवळ भर रस्त्यावर दि बर्निंग ट्रकचा थरार
धरणगाव, जि.जळगाव : येथून जवळच असलेल्या राजवड, ता.पारोळा येथे भर रस्त्यावर बिलखेडा येथून चारा भरुन भामरे, ता.चाळीसगाव येथे जात असलेल्या ट्रकला विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने लागलेल्या आगीचा थरार तब्बल दोन तास चालला. बर्नींग ट्रकला विझविण्यासाठी पारोळा, धरणगाव येथील पालिकेचा अग्नीशमन बंब आल्यानंतर ही आग आटोक्यात आली.
राजवडजवळ गाडी (एमएच-१९-झेड-६६१३) या ट्रकला विजेच्या तारेचा स्पर्श होऊन चाऱ्याची गाडी पेटली. ही गाडी बिलखेडा, ता.धरणगाव येथून चारा भरून भामरे, ता.चाळीसगाव येथे जात होती. ही गाडी रमेश रतन वाघ रा.वाघळी, ता.चाळीसगाव यांची होती. चालकाने समयसुचकतेने रस्त्यावरुन ही गाडी राजवड येथील संजय आत्माराम पाटील यांच्या शेतामध्ये उतरवली. तेथे पाण्याची व्यवस्था असल्याने आग विझविण्यासाठी प्रयत्न केला पण तेवढ्यावर आग विझवली गेली नाही. त्यामुळे एक तासापासून पारोळा, एरंडोल, धरणगाव, अमळनेर येथे फोन करूनदेखील अग्निशामक गाडी आली नाही. त्यामुळे चारा जळून खाक झाला तर गाडीचे बहुतांशी नुकसान झाले. यावेळी पारोळ्याकडून धरणगावला जात असलेले धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, भाजप गटनेते कैलास माळी, अॅड.शरद माळी, प्रा.बी.एन.चौधरी आदींनी थांबून अग्निशमन दलास फोन लावून मदतकार्य मिळावे यासाठी प्रयत्न केले. गावातील, परिसरातील शेतकऱ्यांनीही मदत केली.
या परिसरात विजेच्या तारा लोंबकळत आहेत. नेहमी आगीच्या छोट्या-मोठ्या घटना घडत असतात. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले होते. तब्बल तासानंतर पारोळा, धरणगाव येथील अग्निशामक दलाच्या वाहन येऊन गाडी आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र गाडीचे फार मोठे नुकसान झाले आहे.
शेतीचे नुकसान
ज्या शेतात आग विझविण्यासाठी गाडी टाकण्यात आली. त्या शेतातील शेतमालाचेदेखील खूप नुकसान झाले.