...तर जिल्ह्यातील ८१ हजार वाहने जाणार भंगारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:32 IST2021-02-11T04:32:24+5:302021-02-11T04:32:24+5:30
जालना जिल्ह्यात आजघडीला ३ लाख ६८ हजार ३६० वाहने आहेत. यातील तब्बल ८१ हजार ४३५ वाहने १५ ...

...तर जिल्ह्यातील ८१ हजार वाहने जाणार भंगारात
जालना जिल्ह्यात आजघडीला ३ लाख ६८ हजार ३६० वाहने आहेत. यातील तब्बल ८१ हजार ४३५ वाहने १५ ते २० वर्षांपेक्षा जास्त जुनी आहेत. त्यामुळे नवीन स्क्रॅप पॉलिसी धोरणामुळे ही वाहने भंगारात काढली जाऊ शकतात. मात्र, योजनेत सहभागी होण्यासाठी ग्राहकांची ऐच्छिक मर्जी राहणार आहे. या धोरणांतर्गत खासगी वाहनांची वीस वर्षांनंतर फिटनेस सेंटरमध्ये, तर व्यावसायिक वाहनांची पंधरा वर्षांनंतर फिटनेस सेंटरमध्ये तपासणी करण्यात येईल. ही तपासणी शासनाने ठरवून दिलेल्या फिटनेस सेंटरमध्ये होणार आहे.
मात्र, असे करताना ही चाचणी तांत्रिक व मानवविरहित राहणार असल्याचेही केंद्र शासनाने स्पष्ट केले आहे. फिटनेस टेस्टमध्ये रद्द झालेली वाहने स्क्रॅप केली जाणार आहेत. म्हणजेच ती भंगारात काढली जाणार आहेत. या धोरणाला अनुसरून केंद्र शासनाने ही घोषणा केली आहे. यात उल्लेखनीय बाब म्हणजे प्रदूषणाला आळा घालण्यासाठी व जुनी वाहने रस्त्यावरून नाहीशी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. वाहन स्क्रॅप करण्यासाठी सरकारकडून प्रोत्साहन निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे या धोरणात नागरिक स्वखुशीने सहभागी होतील, अशी आशा निर्माण केली जाणार आहे. जेणेकरून जुनी वाहने लवकरात लवकर रस्त्यावरून हटविण्यात येतील. या नवीन स्क्रॅप पॉलिसीअंतर्गत सर्व वाहनांना ऑटोमेटेड फिटनेस टेस्टिंग या प्रक्रियेतून जावे लागणार आहे. दरम्यान, परिवहन विभागातर्फे ही जनजागृती व नागरिकांना माहिती देण्यात येणार आहे. याबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले.
आतापर्यंत असा होता नियम
जुनी वाहने रस्त्यावरून हटविल्यामुळे आणि नवीन वाहने बाजारपेठेत उपलब्ध झाल्यास कोट्यवधी रुपयांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध होईल, असे सांगितले जाते. जुन्या नियमाप्रमाणे यापूर्वी वाहनांची कधी पंधरा, तर कधी वीस वर्षांनंतर टेस्टिंग करून वाहनांचे रिनीवल करण्यात येत होते. आता मात्र, या नियमात बदल झाला आहे.
केंद्र शासनाचे स्क्रॅप पाॅलिसी धोरण पर्यावरण हिताचे आहे. वाहनधारकांना या योजनेची माहिती देऊन यात सहभागी करून घेतले जाईल. वाहनधारकांनीही पुढाकार घ्यावा, असे आरटीओ विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यातील खासगी वाहने
ग्रामीण २,४४,५२२
शहर १,२५,१८५
जिल्ह्यातील व्यावसायिक वाहने
ग्रामीण १४,२५८
शहर १३,५६६