तहसीलच्या कर्मचा-यांना कारणे दाखवा नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 00:26 IST2018-03-11T00:26:37+5:302018-03-11T00:26:55+5:30
तहसील कार्यालयातील महत्त्वाची प्रलंबित कामे करण्यासाठी शनिवारी बोलावण्यात आलेल्या बैठकीस तब्बल वीस कर्मचारी गैरहजर राहिले. याची गंभीर दखल घेत तहसीलदार डॉ. बिपिन पाटील यांनी गैरहजर कर्मचा-यांना नोटिसा बजावल्या आहेत.

तहसीलच्या कर्मचा-यांना कारणे दाखवा नोटिसा
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : तहसील कार्यालयातील महत्त्वाची प्रलंबित कामे करण्यासाठी शनिवारी बोलावण्यात आलेल्या बैठकीस तब्बल वीस कर्मचारी गैरहजर राहिले. याची गंभीर दखल घेत तहसीलदार डॉ. बिपिन पाटील यांनी गैरहजर कर्मचा-यांना नोटिसा बजावल्या आहेत.
तालुक्यात ११ फेबु्रवारी रोजी तालुक्यातील ज्या गावात अवेळी पाऊस, गारपिटीमुळे झालेल्या फळबाग, नेटशेड आदींचे मोठे नुकसान झाले. याबाबत पंचनाम्या संदर्भात शनिवारी तहसील कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात ग्रामसेवकासह कार्यालयीन कर्मचाºयांच्या आधीच सूचित केले होते. असे असतानाही ग्रामसेवकासह काही कर्मचारी वेळेत कार्यालयात हजर न झाल्याने नुकसानग्रस्त गावाचा आढावा बैठकीत घेता आलेला नाही. तसेच बाधीत गावातील किती खातेदारांचे खातेक्रमाक प्राप्त झाले यात किती शेतकरी पात्र , अपात्र आहेत. याबाबत माहिती अभावी चर्चा झाली नाही. यामुळे तहसीलदार पाटील यांनी अनुपस्थितीत कर्मचा-याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
नैसर्गिक आपत्तीसारख्या गंभीर विषयावर कर्मचारी गंभीर नसल्याची बाब गंभीर असून याबाबत अनुपस्थित कर्मचा-यांनी चोवीस तासांत खुलासा करावा तसेच दिलेल्या कामाचे अनुपालन अहवालही सादर करण्याचे आदेश तहसीलदार यांनी दिले आहेत. अन्यथा संबंधित कर्मचा-यांचे नैसर्गिक आपत्ती २००५ कायद्यानुसार निलंबन करण्यात येणार असल्याचे तहसीलदार पाटील यांनी स्पष्ट केले. अशा प्रकारच्या नोटीस जारी झाल्याने कर्मचा-यांत धास्ती पसरली आहे.