राणी उंचेगावकरांच्या संभाषणामध्ये होतोय अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:56 IST2021-02-21T04:56:53+5:302021-02-21T04:56:53+5:30
राणी उंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगावसह परिसरातील आठ गावांत विविध मोबाइल कंपन्यांचे १५ हजारांपेक्षा अधिक ग्राहक आहेत. असे ...

राणी उंचेगावकरांच्या संभाषणामध्ये होतोय अडथळा
राणी उंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगावसह परिसरातील आठ गावांत विविध मोबाइल कंपन्यांचे १५ हजारांपेक्षा अधिक ग्राहक आहेत. असे असतानाही एकाही कंपनीचे नेटवर्क व्यवस्थित मिळत नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांचे संभाषण अडखळत होत आहे. विशेष म्हणजे, मागील दोन ते तीन वर्षांपासून मोबाइलला नेटवर्क मिळत नाही. अनेकवेळा संबंधित कंपन्यांकडे तक्रारी करण्यात आल्या; परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
माहिती आणि प्रसारणाच्या या युगात मोबाइल हे महत्त्वाचे साधन आहे. नागरिकांना शासकीय असलेल्या बीएसएनएलसह इतर कंपन्यांकडून सेवा दिली जाते. लोकांनी आपल्याच कंपनीला प्राधान्य द्यावे, यासाठी कंपन्यांकडून आकर्षक ऑफर दिल्या जातात, तसेच जाहिरातींद्वारे आमच्याचं कंपनीचे नेटवर्क चांगले असल्याचे दाखविले जाते. कंपन्यांच्या आकर्षक ऑफर व जाहिरातीमध्ये दाखविलेली नेटवर्कची सुविधा यामुळे बहुतांश लोक संबंधित कंपनीचे ग्राहक बनतात; परंतु ग्रामीण भागात गेल्यावर एकाही कंपनीचे नेटवर्क व्यवस्थित चालत नाही. त्यामुळे ग्राहकांचे संभाषण अडखळत होते.
घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव परिसरात बीएसएनएलचे एक व खासगी कंपनीचे एक असे दोन टॉवर आहेत. हे टॉवर्स असतानाही ग्राहकांना नेटवर्क मिळत नाही. नेटवर्क मिळत नसल्याने राणी उंचेगावसह तळेगाव, भुतेगाव, दाई अंतरवाली, मानेपुरी, राठी अंतरवाली, शेवगळ, मुढेगाव या गावांतील नागरिक त्रस्त आहेत. अनेकवेळा संबंधितांकडे तक्रारी करण्यात आल्या; परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे. नेटवर्क मिळत नसल्याने शासकीय कार्यालयांसह खासगी कार्यालये व बँकांचे कामकाज ठप्प झाले आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
ग्राहकांची होतेय लूट
कंपन्या वेगवेगळ्या ऑफर देऊन ग्राहकांना आकर्षित करतात. त्यानंतर ग्राहकाही एकदाच दोन ते तीन महिन्यांचे रिचार्ज टाकतात; परंतु नेटवर्क नसल्याने रिचार्जचा पुरेपूर वापर केला जात नाही. मुदत संपली की, कंपनी रिचार्ज परत घेते. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक झळ सोसावी लागते.
गावामध्ये नेटवर्क नसल्याने संभाषणामध्ये अडथळ होतो. यामुळे ऑनलाइन कामकाजही ठप्प झाले आहे. ऑनलाइन काम करायचे असेल तर घनसावंगी किंवा जालना शहरात जावे लागते. याबाबत अनेकवेळा तक्रारी देखील करण्यात आल्या; परंतु काहीच फायदा झाला नाही. आमच्याकडे मोबाइल असून नसल्यासारखा झाला आहे.
गजानन मंडाळ, ग्रामस्थ, मानेपुरी