धुवाँधार, मुसळधार, संततधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 00:56 IST2018-08-17T00:55:30+5:302018-08-17T00:56:45+5:30
गेल्या वीस दिवसानंतर जिल्ह्यात पावसाने गुरूवारी जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

धुवाँधार, मुसळधार, संततधार
जालना : गेल्या वीस दिवसानंतर जिल्ह्यात पावसाने गुरूवारी जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. पिके माना टाकू लगले असतानाच हा दमदार पाऊस पडल्याने या पिकांना जीवनदान मिळणार आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिने लोटले आहेत. मात्र गुरूवारी प्रथमच नदी-नाले ओथंबून वाहिले.
गुरूवारी पहाटेपासूनच दमदार पावसाचे पुनरागमन झाल्याने जालनेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. जालना शहरासह आठही तालुक्यात या पावसाची सर्वदूर हजेरी असल्याने संपूर्ण जिल्हा ओलाचिंब झाला होता. गुरूवारी जालनेकरांना सूर्यदर्शनही झाले नाही. कधी हलका तर कधी मुसळधार पाऊस बरसल्याने संपूर्ण वातावरणात गारवा निर्माण झाला होता.
जालन्यातील कुंडलिका नदीवर असलेल्या रामतीर्थ बंधारा पूर्णक्षमतेने भरल्याने भरून वाहिला. तर नदीलाही पूर आला होता.जालन्यातील अनेक सखल भागात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. जालना शहरासह परतूर, भोकरदन, अंबड, कुंभारपिंपळगाव, घनसावंगी, तीर्थपूरी, बदनापूर, जाफराबाद तसेच मंठा तालुक्यातही दमदार पावसाने हजेरी लावली होती. केदारखेडा परिसरातही मुसळधार पाऊस झाला, राजूर, दाभाडी, टेंभूणी हसनाबाद, वाटूरफाटा, वीरेगाव, रामनगर आदी गावांमध्येही गुरूवारी जोरदार पावसाने हजेरी लावल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, या पावसामुळे पिकांप्रमाणेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे. जिल्ह्यात सध्या ५४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ही टँकरची संख्या आता कमी होणारआहे.