न्याय, क्षमा आणि परोपकार ही तंटामुक्तीची त्रिसूत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:38 IST2017-11-30T00:37:55+5:302017-11-30T00:38:09+5:30
न्याय, परोपकार आणि क्षमा या त्रिसूत्रीचा जीवनात अवलंब केला, तर तंटामुक्त समाजाची निर्मिती व्हायला वेळ लागणार नाही, असे मत मौलाना बशीर अहमद राही यांनी येथे केले.

न्याय, क्षमा आणि परोपकार ही तंटामुक्तीची त्रिसूत्री
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : न्याय, परोपकार आणि क्षमा या त्रिसूत्रीचा जीवनात अवलंब केला, तर तंटामुक्त समाजाची निर्मिती व्हायला वेळ लागणार नाही, असे मत मौलाना बशीर अहमद राही यांनी येथे केले.
येथील दु:खीनगरमध्ये जमाअते इस्लामी हिंदच्या कार्यालयात मुस्लिम कौटुंबिक समुपदेशन केंद्राचा सोमवारी शुभारंभ करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मौलाना इलियास फलाही, काजी मुफ्ती अब्दुल रहमान, मौलाना सुहेल नदवी, मौलाना अ. रऊफ नदवी, मुफ्ती अनस खान नदवी यांची उपस्थिती होती.
मुस्लिम समाजातील तंटे आपसात मिटविण्यासाठी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत कार्यालयात समुपदेशन केले जाणार आहे.
तंटे सामोपचाराने मिटले तर त्यात सर्वांचेच हित असते, असे मौलाना इलियास फलाही म्हणाले. शहर काजी मुफ्ती अब्दुल रहमान म्हणाले की, तंटे शांतीच्या मार्गाने सुटले पाहिजे. त्यातून वेळ आणि पैशांचा अपव्यय होणार नाही. कोणताही मुसलमान जर व्यक्तिगत कायद्याचे (पर्सनल लॉ) पालन करत असेल तर ही भारतीय संविधानाच्या संरक्षणाची हमी आहे. तर मौलाना सुहेल नदवी म्हणाले, तंटामुक्तीसाठी अनेक संघटना काम करीत असल्या तरी अपेक्षित बदल दिसून येत नाही. कारण जो कोणी इतरांमध्ये बदल पाहू इच्छितो, तो स्वत:ला मात्र विसरतो.
मौलाना सुहेल नदवी, मुफ्ती अनस खान नदवी यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन मौलाना हाफीज शब्बीर अहमद यांनी केले. तर आभार प्रदर्शन सय्यद शाकेर यांनी मानले. मौलाना गुलाम अहमद नदवी, शेख मुजीब, मौलाना ईसा खान काशफी, मौलाना अहमद नदवी, हाफीज तहसिन आलम, हाफीज आमेर मौलाना यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.