वक्तृत्व स्पर्धेत जालना ते दिल्लीपर्यंतचा प्रवास - शिवानी शिरसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 00:10 IST2019-03-08T00:10:23+5:302019-03-08T00:10:54+5:30

माझ्या राष्ट्रीय युवा संसद थेट दिल्लीपर्यंत या प्रवासामध्ये संघर्ष तर मला करावाच लागला; पण तो संघर्ष फक्त बुद्धिमत्तेचा होता.

Journey from Jalna to Delhi in Oratory Competition - Shivani Shirsat | वक्तृत्व स्पर्धेत जालना ते दिल्लीपर्यंतचा प्रवास - शिवानी शिरसाट

वक्तृत्व स्पर्धेत जालना ते दिल्लीपर्यंतचा प्रवास - शिवानी शिरसाट

जालना : माझं प्राथमिक शिक्षण हे जालना तालुक्यातील कुंभेफळ या गावी झालं. नंतर वडिलांनी जालना शहरातील ज्ञानज्योत महाविद्यालय येथे शिक्षणासाठी माझा प्रवेश निश्चित केला. सुरुवातीलाच सांगावसं वाटतं की, माझ्या राष्ट्रीय युवा संसद थेट दिल्लीपर्यंत या प्रवासामध्ये संघर्ष तर मला करावाच लागला; पण तो संघर्ष फक्त बुद्धिमत्तेचा होता.
आर्थिक संघर्ष माझ्या नशिबात आलाच नाही. याचं एकमेव कारण ते माझे आई-वडील आहेत. माझ्या आजपर्यंतच्या यशाचे सर्व श्रेय त्यांना जाते. माझे वडील शेतकरी असूनही त्यांनी शिक्षणाला महत्त्व दिले. मला वाचनाची आवड निर्माण झाली ती आमच्या घरी असणाऱ्या ग्रंथालयामुळे. गावाकडे वडिलांनी सार्वजनिक वाचनालय गावात सुरु केले. आणि त्याचा फायदा झाला तो मला. पुस्तके हेच मी जीवन समजू लागले. त्या ग्रंथालयातील थोर नेत्यांची आत्मचरित्र वाचू लागले. त्याचा परिणाम, माझ्या शालेय जीवनावर झाला. जिजाऊंचे संस्कार, स्वामी विवेकानंद यांचे अध्यात्मिक ज्ञान, डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचा दृढ विश्वास यामुळे माझ्यातल्या वक्तृत्वाने भरारी घ्यायला सुरुवात केली. फक्त वक्तृत्वच नाही तर मी शालेय जीवनात सुद्धा गुणवत्ताच्या यादीत स्थान मिळवलं ते वाचनाच्या सवयीमुळे. त्यानंतर विद्यालयामध्ये माझी वक्तृत्वाची मुळे खोलवर रुजली गेली. शाळेतल्या प्रत्येक स्पर्धेत आणि प्रत्येक नेत्याच्या जयंतीच्या भाषणांमध्ये मी सहभाग घेऊ लागले. त्यासाठी मला महत्त्वाची मदत मिळाली ती माझे काकाकडून त्यानंतर अकरावी व बारावीसाठी जालन्यातील बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात प्रवेश घेतला. स्वप्न होते डॉक्टर बनण्याचे ! दोन वर्ष मेहनत केली अभ्यास केला. पण कुठे तरी मी कमी पडले आणि मी मेडिकलला प्रवेश घेऊ शकले नाही.
जेईएस महाविद्यालयामध्ये बीएससी प्रथम वर्षाला प्रवेश घेतला. या दरम्यानच मी वादविवाद स्पर्धेत सहभाग घेतला. व त्यामध्ये जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक मिळवला. यामुळे माझा आत्मविश्वास वाढत गेला. त्यानंतर जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय स्पर्धेमध्येही सहभाग घेतला. राष्ट्रीय युवा संसद जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मी सहभाग घेतला. यात मी प्रथम क्रमांक मिळावला. पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय युवा संसदमध्ये सहभाग नोंदवून मी जिल्ह्याचे नेतृत्व केलं. यातून मी दिल्लीच्या राष्ट्रीय युवा संसदेसाठी पात्र झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्रातील २७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. येथेही चांगला प्रयत्न केला. एक युवा म्हणून देशाच्या नेतृत्वासाठी या राष्ट्रीय संसदेत सहभाग नोंदवला आणि त्यातून एक राष्ट्रप्रेमाची भावना मनामध्ये जागृत झाली. मला सहकार्य केलेल्या सर्वाचे मी आभारी आहे. सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा .
- शब्दांकन : दीपक ढोले

Web Title: Journey from Jalna to Delhi in Oratory Competition - Shivani Shirsat