मृत्यूची विहीर! नियंत्रण सुटल्यानं कार थेट विहिरीत; दोन दिवसांत दोन अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 11:38 IST2021-02-14T11:01:53+5:302021-02-14T11:38:16+5:30
जालन्यात कार विहिरीत कोसळून मायलेकींचा मृत्यू; अपघात रोखण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्याची मागणी

मृत्यूची विहीर! नियंत्रण सुटल्यानं कार थेट विहिरीत; दोन दिवसांत दोन अपघात
जालना: जामवाडी येथे कारचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगत असलेल्या विहिरीत पडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना दोन दिवसापूर्वीच घडली होती. त्यानंतर आज (रविवारी) पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास कारचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या विहिरीत पडून मायलेकींचा मृत्यू झाला. तर तिघे जण गंभीर जखमी झाले.
आरती गोपाल फांदडे (३०) व माही गोपाल फांदडे (४ रा. सिंगडोह ता. मानोरा जि. वाशीम) या माय-लेकीचा या अपघातात मृत्यू झाला. तर गोपाल विठ्ठल फादडे (३५ रा. सिंगडोह ता. मानोरा जि. वाशीम), वेदिका फादडे (दीड वर्ष), जय गुणवंत वानखेडे (१७ रा. देवठाणा ता. मानोरा जि.वाशिम) हे तिघे गंभीर जखमी झाले. वाशीम जिल्ह्यातील फादडे कुटुंबिय रविवारी पहाटेच्या सुमारास एका कारमधून औरंगाबाद- देऊळगाव राजा मार्गावरून जात होते. त्यांची कार जामवाडी शिवारात आली असता समोरून अचानक एक ट्रक कारच्या दिशेने आला. त्यामुळे कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ती रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळली.
घटनेची माहिती मिळताच तात्काळ ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून गोपाळ फादडे, वेदिका फादडे, जय वानखेडे या तिघांना विहिरीबाहेर काढले. या अपघातात आरती फादडे व त्यांच्या चार वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. जखमींवर जालना शहरातील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी याच विहिरीत एक कार पडल्याने दोघांचा मृत्यू झाला होता.
जामवाडी येथे रस्त्याच्या शेजारीच एक विहीर आहे. रस्ता वळणदार असल्यानं या भागात असलेली विहीर धोकादायक बनली आहे. वाहनावरील नियंत्रण सुटल्यानंतर अपघात होऊन वाहन विहिरीत कोसळत असल्याच्या घटना घडल्या आहेत. अपघात रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.