जायकवाडीतील पाण्यामुळे गोदावरी तुडुंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:32 IST2019-09-18T00:31:57+5:302019-09-18T00:32:19+5:30
जायकवाडी धरण पूर्णपणे भरले, त्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने शहागड परिसरातून वाहणारी गोदावरी दुथडी भरून वाहताना दिसून आली.

जायकवाडीतील पाण्यामुळे गोदावरी तुडुंब
लोकमत न्यूज नेटवर्क
शहागड : जालना जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. याचा परिणाम पिकांच्या वाढीवर झाला असून, पिण्याच्या पाण्याची टंचाई भर पावसाळ्यात कायम आहे. भविष्यात ही पाणी टंचाई आणखी वाढणार असल्याने चिंता कायम आहे. असे असले तरी नाशिक, नगर भागात चांगला पाऊस झाल्याने जायकवाडी धरण पूर्णपणे भरले, त्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने शहागड परिसरातून वाहणारी गोदावरी दुथडी भरून वाहताना दिसून आली.
मंगळवारी भल्या पहाटे शहागडजवळून वाहणाऱ्या गोदावरीत पाण्याचा खळाळता प्रवाह पाहून शहाडकरांनी समाधान व्यक्त केले. गेल्या महिन्याभरात दोनवेळेस हे नदीपात्र दुथडी भरून वाहिल्याने या भागातील भूजल पाणीपातळीत वाढ झाली आहे. तसेच विहिरींची पाणी पातळी देखील लक्षणीय वाढल्याचे सांगण्यात आले.
या गोदावरीला आलेल्या पुरामुळे परिसरातील जवळपास ३० ते ४० गावांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यामुळे सुकलेल्या उसाला संजीवनी मिळणार असल्याचे शेतकऱ्यांनी नमूद केले. एकूणच जायकवाडीतून दहा हजार क्येसेक पाणी सोडण्यात आल्यानेच हा पूर आल्याचे पाटबंधारे अधिकाºयांनी सांगितले.