कापसाच्या दरात वाढ होत नसल्याने शेतकरी हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:22 IST2020-12-27T04:22:34+5:302020-12-27T04:22:34+5:30
जळगाव सपकाळ : नगदी पीक म्हणून भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली होती. मात्र, ...

कापसाच्या दरात वाढ होत नसल्याने शेतकरी हवालदिल
जळगाव सपकाळ : नगदी पीक म्हणून भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली होती. मात्र, भावात अपेक्षित वाढ न झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी घरात कापूस साठवून ठेवला आहे. परंतु, बहुतांश शेतकऱ्यांना पैशाची गरज असल्याने शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना कापसाची बेभाव विक्री करत आहे.
भोकरदन तालुक्यात यंदा जूनच्या सुरूवातीपासूनच पर्जन्यमान चांगले राहिल्याने एक लाख तीन हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. यात ४२ हजार ३०० हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. कपाशीला पाते व बोंड लागण्याच्या काळातच पाऊस झाल्याने पातेगळ झाली. त्यानंतर बोंड अळीचा देखील मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. शेतकऱ्यांनी औषध फवारणीवर मोठा खर्च करुन रोग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, परतीच्या पावसाने कापूस घरात येण्याच्या काळातच थैमान घातल्याने उत्पादन घटले. पावसाच्या भीतीने बहुतांश शेतकऱ्यांनी परजिल्ह्यातून मजूर आणून जास्तीची मजुरी देऊन कापूस वेचून घरी आणला. कापसाचे भाव वाढल्यास लागवडीवर झालेला खर्च निघेल, या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी घरात कापसाची साठवण केली. सुरुवातीला कापसाला ५४०० ते ५५०० रूपयापर्यंत भाव मिळाला होता. परंतु, त्यानंतर भावात घसरण झाली. सध्या ५ हजार २०० रूपये प्रति क्विंटल भाव आहे. भाव वाढत नसल्याने बहुतांश शेतकरी खासगी व्यापाऱ्यांकडे कापसाची विक्री करीत आहे. परंतु, व्यापारी कवडीमोल भावात कापसाची खरेदी करीत आहे. मागील सहा वर्षांपासून तालुक्यातील शेतकरी दुष्काळाशी दोन हात करीत आहे. यंदा चांगले उत्पन्न झाल्याने शेतकऱ्यांना चांगल्या उपन्नाची अपेक्षा होती. परंतु, अवेळी पडलेला पाऊस व भावात झालेली घसरण यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. त्यातच अतिवृष्टीचे अनुदान मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.
निसर्गाचे दृष्टचक्र शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक हतबल झाले आहे. दुसरीकडे बाजारपेठेत शेतीमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतीसाठी लागवड केलेला खर्च देखील निघत नाही. सध्या व्यापारी कापूस कमी भावात मागत असल्याने ३० क्विंटल कापूस घरात पडून आहे. कापूस विकावा तरी संकट, नाही विकावा तरी संकट.
गणेश मुठ्ठे, शेतकरी.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कपाशीचे गठाण व सरकीलाच अपेक्षित भाव व मागणी नसल्याने कापसाचे दर कोसळले आहे. सध्या शेअर बाजारदेखील कोसळले आहे.
नरेश ताडे, कापूस व्यापारी
रविवारपर्यंत जिनिंग बंद
बहुतांश शेतकरी सीसीआय केंद्राकडे वळाले आहेत. सीसीआय केंद्रात आतापर्यंत एक लाख सोळा हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. सध्या सीसीआय केंद्रात कापूस ठेवण्यास जागा नसल्याने रविवारपर्यंत जिनिंग बंद ठेवण्यात येणार आहे.
दादाराव दळवी, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, जालना.