'५०० कोटीची वसूली समोर येईल...'; धुळे कॅश प्रकरणात नार्को टेस्ट करा: कैलास गोरंट्याल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 15:25 IST2025-06-03T15:24:31+5:302025-06-03T15:25:46+5:30
विरोधी पक्षानेही मुद्दा आक्रमकपणे उचलला नाही:

'५०० कोटीची वसूली समोर येईल...'; धुळे कॅश प्रकरणात नार्को टेस्ट करा: कैलास गोरंट्याल
जालना : धुळे येथील शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या रकमेचे प्रकरण विरोधी पक्षाने आक्रमकपणे उचललेले नाही. शिवाय होणारा तपासही योग्य पद्धतीने होत नाही. त्यामुळे या प्रकरणात किशोर पाटील यांची नार्को टेस्ट करावी. या तपासणीनंतर आजवर ५०० कोटी रुपये वसूल केल्याचा प्रकार समोर येईल, असा आरोप काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला. नार्को टेस्ट झाली नाही तर आपण न्यायालयात दाद मागू, असेही ते म्हणाले.
गोरंट्याल यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला. राज्य सरकारने गठित केलेल्या अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर आणि या समितीतील अन्य आमदार सदस्य धुळे दौऱ्यावर असताना शासकीय विश्रामगृहात किशोर पाटील यांच्या नावाने बुक असलेल्या एका खोलीत १ कोटी ८० लक्ष रुपयांची रक्कम धुळे पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने लक्ष घालत या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले असले तरी मुख्य आरोपींना मात्र राज्य सरकारकडून पाठीशी घालण्याचे काम होत असल्याचा आरोप गोरंट्याल यांनी केला.
अंदाज समिती अध्यक्ष खोतकर यांचे स्वीय सहायक व मंत्रालयात अधिकारी पदावर कार्यरत असलेले किशोर पाटील यांच्यासह अन्य दोनजणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात किशोर पाटील यांची राज्य सरकारने नार्को टेस्ट करण्याची मागणीही गोरंट्याल यांनी केली. राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप झाला तर त्यांना तीन वर्षे जेलमध्ये ठेवण्यात आले. मात्र, धुळे प्रकरणात अपेक्षित तपास होत नसल्याचा आरोप गोरंट्याल यांनी केला. दरम्यान, यासंदर्भात अर्जुन खोतकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.
गोरंट्याल-खोतकर वाद जुनाच
काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि शिवसेनेचे उपनेते, माजी मंत्री आमदार अर्जुन खोतकर हे एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत. शासकीय मेडिकल कॉलेज, पाणीपुरवठा योजनेच्या श्रेयवादासह जालना विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांवरून त्या दोन्ही नेत्यांमध्ये वारंवार आरोप-प्रत्यारोप होताना दिसतात.