वातावरणातील बदलांमुळे बळिराजा चिंताग्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:32 IST2021-08-23T04:32:08+5:302021-08-23T04:32:08+5:30
विष्णू वाकडे जालना : तालुक्यात खरीप हंगामात ८७ हजार ११९ हेक्टरवर खरिपाचा पेरा झाला आहे. परंतु, वातावरणातील बदलाचा फटका ...

वातावरणातील बदलांमुळे बळिराजा चिंताग्रस्त
विष्णू वाकडे
जालना : तालुक्यात खरीप हंगामात ८७ हजार ११९ हेक्टरवर खरिपाचा पेरा झाला आहे. परंतु, वातावरणातील बदलाचा फटका कापूस, सोयाबीनसह इतर पिकांना बसू लागला आहे. औषधांची फवारणी करूनही रोगराई आटोक्यात येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
जालना तालुक्यामध्ये कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार सरासरी ८८ हजार ४७७ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी अपेक्षित होती. जून महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वत्र दमदार पाऊस झाल्याने तालुक्यामध्ये ८७ हजार ११९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. बाजरी, मका, खरीप ज्वारीचे उद्दिष्ट पूर्ण झाले नसले तरी ३१४० हेक्टरवर पेरणी झाली. तूर, मूग, उडीद या पिकाची सरासरीच्या तुलनेत ५० टक्क्यांच्यावर १६ हजार ९८१ हेक्टरवर पेरणी झाली. तुरीच्या क्षेत्रांमध्ये सरासरीच्या तुलनेत ४ हजार ३५३ हेक्टर पेरा झाला, तर मुगाच्या पेरणीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. मुगाचे सरासरी क्षेत्र १६ हजार २८५ हेक्टर असताना अवघ्या २ हजार ८०४ हेक्टरवर मुगाची पेरणी झाली. एकूण गळीत धान्याचा विचार केला तर १६ हजार ४२२ हेक्टर सरासरी क्षेत्र पेरणीचे निश्चित असताना तब्बल ३४ हजार ५२७ हेक्टरवर पेरणी झाली. यामध्ये सोयाबीनचे १६ हजार १९१ सरासरी पेरणी क्षेत्र दुपटीने वाढून ३४ हजार ६५ हेक्टर झाले. सरासरीच्या तुलनेत हे क्षेत्र १७ हजार ८७८४ हेक्टरने वाढले. मागील काही वर्षांचा अनुभव पाहता यावर्षी खरीप हंगामात चांगले उत्पन्न मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु, बदलत्या वातावरणाचा पिकांना फटका बसू लागला आहे. कापूस पिकांनी माना टाकल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. काढणीस आलेल्या मुगाचे नुकसान होत आहे. शिवाय सोयाबीनच्या पिकातही पाणी साचल्याने या ठिकाणी सोयाबीनचे नुकसान होत आहे.
कोट
गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून पशुधनाच्या बळावर, तसेच सध्या आधुनिक यंत्राच्या साह्याने आपण शेती करीत आहोत. शेती व्यवसायामध्ये अनेक संकटे असतात. जोपर्यंत शेतातील माल घरात येत नाही तोपर्यंत काहीच खात्री नसते.
विनायकराव आटोळे, हातवन
गतवर्षीचा अनुभव वाईट आहे. गतवर्षी काढणीस आलेल्या मुगाला जागेवरच कोंब फुटले होते. कापसाचे बोंडेसुद्धा सडले होते. निसर्गाच्या भरवशावर असणारा शेती व्यवसाय असून, हातातोंडाशी आलेले कधी हिरावून घेईल सांगता येत नाही. त्यामुळे पीक हातात आल्याशिवाय समाधान नाहीच.
प्रल्हादराव गायकवाड, खणेपुरी
मी आधुनिक पद्धतीने शेती कसतो. परंतु, तरीही फळपिके असो अथवा खरिपातील पिके असोत अनेकदा केलेला खर्चही वसूल होत नाही. गतवर्षी पाईपलाईनवर झालेला खर्चसुद्धा निघाला नाही. विविध संकटांमुळे शेती व्यवसाय अनिश्चित स्वरुपाचा बनत चालला आहे.
संदीप घारे, साळेगाव