गरिमाच्या संचालकांनी गरिबांच्या पैशातून घेतली २०० एकर जमीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 00:36 IST2018-09-05T00:35:27+5:302018-09-05T00:36:02+5:30
गुंतवणूकदारांच्या रकमेतून गरिमा रिअल इस्टेट कंपनीच्या संचालकांनी रत्नागिरी जिल्ह्यात चक्क २०० एकर शेतजमीन खरेदी केल्याचे तपासात उघड झाले आहे.

गरिमाच्या संचालकांनी गरिबांच्या पैशातून घेतली २०० एकर जमीन
संजय देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मोलमजुरी करून बचत केलेले पैसे तीन वर्षात दुप्पट करून देण्याचे आमिष दाखविल्याने जिल्ह्यातील हजारो कष्टकऱ्यांनी आपल्या घामाचे पैसे गरिमा रिअल इस्टेट कंपनीत गुंतविले होते. दुप्पट पैसे तर सोडाच; परंतु मुद्दलही न मिळाल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले होते. तर दुसरीकडे या गुंतवणूकदारांच्या रकमेतून गरिमा रिअल इस्टेट कंपनीच्या संचालकांनी रत्नागिरी जिल्ह्यात चक्क २०० एकर शेतजमीन खरेदी केल्याचे तपासात उघड झाले आहे.
जालना जिल्ह्यात २०१० ते २०१५ या दरम्यान गरिमा रिअल इस्टेट कंपनीने जवळपास अडीच हजार गुंतवणूकदारांकडून प्रथमदर्शनी अंदाजित साडेचार कोटी रूपयांची गुंतवणूक केली होती. त्या पैकी ९०० जणांची साधारपणे दोन कोटी ९ लाख रूपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. या गरिमा कंपनीने जालन्या प्रमाणेच औरंगाबाद जिल्ह्यातील गुंतवणूकदारांनही गंडा घातला आहे. या प्रकरणी जालन्यातील आर्थिक गुन्हे शाखेने माजी आ. बनवारीलाल कुशवाह याला ३० आॅगस्टला जालना येथील जिल्हा न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी त्याला पाच सप्टेबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. या पाच दिवसांच्या पोलीस कोठडी दरम्यान, कुशवाह यांनी गुंतवणूक दारांच्या पैशातून रत्नागिरी जिल्ह्यातील लांजिया तालुक्यात जवळपास २०० एकर शेतजमीन घेतल्याचे सांगितले. या माहितीवरून पोलिसांनी रत्नागिरी येथे जाऊन १८ रजिस्ट्री आणि सातबारा उताºयांची माहिती आणली आहे. या जमिनीची नेमकी किंमत किती होते, याचा तपशील मिळविण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, बुधवारी बनवारीलाल कुशवाह याच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असून, त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
गेल्याच महिन्यात औरंगाबाद पोलिसांनी गरिमाच्या याच माजी आ. बनवारीलाल कुशचाहला राजस्थानमधील धवलपूर येथून फसणूक प्रकरणात अटक करून न्यायालयात हजर केले होते. त्याचवेळी जालना येथील आर्थिक गुन्हे शाखेने पत्र व्यवहार करून हाच संशयित आरोपी आम्हालाही हवा असून, त्याला आमच्याकडे स्वाधीन करावे अशी मागणी केली होती. मात्र ती नाकारण्यात आली. विशेष म्हणजे यामुळे औरंगााद नंतर जालन्याच्या पोलिसांना धवलपूर येथे फेरा मारून कुशवाहला अटक करून जालन्यात आणावे लागले. यामुळे एक प्रकारे शासनाचा प्रवास भत्त्यासह अन्य खर्च वाढला आहे. समन्वयाचा अभाव असल्यानेच हे असे घडल्याचे दिसून आले.