लेख: शाळकरी मुलं का घेताहेत मित्रांचाच जीव?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 09:53 IST2025-06-16T09:51:03+5:302025-06-16T09:53:10+5:30
मुलांच्या हाती इतकी हिंसक शस्त्रास्त्रं कशी येतात? आपल्याच मित्रांवर, शाळकरी विद्यार्थ्यांवर गोळ्या चालवण्याची, आपल्या शिक्षकांना ठार मारण्याची हिंमत त्यांच्यात कुठून येते आणि ही दुर्बुद्धी त्यांना कशी सुचते?

लेख: शाळकरी मुलं का घेताहेत मित्रांचाच जीव?
काही दिवसांपूर्वीचीच घटना. ऑस्ट्रियाचं ग्राज शहर. तिथली एक प्रसिद्ध शाळा. सकाळची वेळ. शाळेत सगळी लगबग सुरू. त्याच वेळी त्याच शाळेचा एक माजी विद्यार्थी येतो. त्याच्या हातात बंदूक असते. तिथे जमलेल्या मुलांवर तो अंदाधुंद गोळीबार करतो. त्यानंतर तो स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या करतो. या घटनेत किमान अकरा जण ठार झाले. त्यांत शाळेच्या एका शिक्षिकेचाही समावेश आहे.
या घटनेमुळे शाळकरी विद्यार्थ्यांमधील हिंसाचाराची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. का होतात अशा घटना? मुलांच्या हाती इतकी हिंसक शस्त्रास्त्रं कशी येतात? आपल्याच मित्रांवर, शाळकरी विद्यार्थ्यांवर गोळ्या चालवण्याची, आपल्या शिक्षकांना ठार मारण्याची हिंमत त्यांच्यात कुठून येते आणि ही दुर्बुद्धी त्यांना कशी सुचते?
अलीकडच्या काळात ऑस्ट्रियामध्ये या घटना वारंवार घडायला लागल्या असल्या तरी याबाबतीत जगातील सर्वांत समृद्ध आणि विकसित देश अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत दर काही दिवसांत अशा घटना घडल्याच्या पाहायला मिळतात. शाळकरी विद्यार्थ्यांच्या हत्या होण्यात अमेरिकेचं प्रमाण सर्वांत अधिक आहे. मुलांना सहजपणे हत्यारे उपलब्ध होणं, हत्यारं बाळगण्याबाबत पुरेसे कठोर कायदे नसणं आणि शस्त्रास्त्रांची लॉबी लोकांच्या जीवनमरणापेक्षा अधिक महत्त्वाची तसंच बळकट असणं ही कारणं तर त्यामागे आहेतच; पण शाळकरी मुलं इतकी हिंसक का होतात, यामागची कारणं आता अभ्यासकांना आणि संशोधकांना अधिक चिंतेत टाकताहेत.
या संदर्भात नुकताच झालेला एक अभ्यास सांगतो, त्या त्या देशांतलं गनकल्चर. घरातच आई-बापाकडून मुलांना मिळालेली हिंसेची संस्कृती... ही कारणंही त्यामागे आहेत. कुटुंबातील विसंवाद, त्यांच्यातील भांडणं, पालकांचं मुलांवर लक्ष नसणं, मुलांना त्यांची ‘स्पेस’ देण्याच्या नावाखाली पालकांनी स्वत:च्याच मस्तीत मश्गुल राहणं, मुलांमधील मानसिक विकार, नैराश्य... यांमुळेही अशा घटना घडताहेत. त्याकडे कोणाचंच गांभीर्यानं लक्ष नाही.
अभ्यासकांनी याहीपेक्षा आणखी काही महत्त्वाच्या कारणांकडे लक्ष वेधलं आहे. ही कारणं तर आपल्या खिजगणतीतही नाहीत. पालक, शिक्षक, शाळाही त्यांच्याकडे फारसं गांभीर्यानं पाहत नाहीत. त्यांच्या दृष्टीनं जणू काही या गोष्टीशी आपला काही संबंधच नाही!
मुलं हिंसक का बनतात आणि इतक्या टोकाचा विचार का करतात आणि प्रत्यक्ष तशी कृतीही करतात यामागचं सर्वांत महत्त्वाचं कारण आहे, सोबतच्याच मुलांनी, मित्र-मैत्रिणींनी सारखं चिडवणं, मानसिक, शारीरिक छळ करणं, धमक्या देणं... यांमुळे वैतागून एका टोकाच्या क्षणी मुलं अशी कृत्यं करतात आणि त्याचं प्रमाण ७५ टक्के आहे.
सूडाच्या भावनेनं घडलेल्या घटना ६१ टक्के, तर इतर कारणांमुळे घडलेल्या घटनांचं प्रमाण ५४ टक्के आहे. आपल्याला आणि आपल्या प्रश्नांना आता कोणीच वाली नाही, त्यामुळे हा प्रश्न आता आपणच सोडवला पाहिजे, या हेतूनं बंदुका उचलणाऱ्या मुलांचं प्रमाण ३४ टक्के आहे. नैराश्यामुळे घडलेल्या घटना २७ टक्के, तर कोणीच आपल्याकडे लक्ष देत नाही ना, मग आपणच इतरांचं लक्ष वेधून घेऊ, म्हणून घडलेल्या घटनांचं प्रमाणही २४ टक्के आहे !