Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 15:14 IST2025-05-11T15:11:20+5:302025-05-11T15:14:34+5:30
India Pakistan ceasefire broken: पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्याने भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यासोबत चर्चा केली आणि दोन्ही देशात शस्त्रसंधी झाली. त्या शस्त्रसंधीचं अंधार पडताच काय झालं, हे सगळ्यांनी बघितलं, पण शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानचे डीजीएमओ कोण आहेत?

Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान यांच्यातील लष्करी संघर्ष शिगेला पोहोचलेला असतानाच अचानक तात्काळ प्रभावाने शस्त्रसंधी करण्याची घोषणा झाली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली. नंतर परराष्ट्र मंत्रालयाने कोणत्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली आणि काय झाली याची माहिती दिली. पाकिस्तानचे डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स आणि भारताचे डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स यांच्यात ही चर्चा झाली. लष्करात महासंचालक हे पद खूप महत्त्वाचे असते. सर्व लष्करी मोहिमांची जबाबदारी त्यांच्यावरच असते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शस्त्रसंधी करण्यासंदर्भातील चर्चेत भारताच्या लष्कराचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई हे सहभागी झाले होते. पाकिस्तानचे डीजीएमओंनी घई यांना स्वतःहून कॉल केला होता.
पाकिस्तानचे डीजीएमओ कोण?
शस्त्रसंधीसाठी स्वतःहून कॉल करणारे पाकिस्तानचे डीजीएमओ होते, मेजर जनरल काशिफ अब्दुल्लाह. त्यांनीच भारताचे डीजीएमओ राजीव घई यांच्याशी चर्चा केली होती. दुपारी तीन वाजता चर्चा झाली. १० मे रोजी पाच वाजेपासून शस्त्रसंधीचं पालन करायचं ठरलं होतं. पण, रात्री पाकिस्तानी लष्कराकडून पुन्हा हल्ले करण्यात आले.
लष्करात डीजीएमओचे पद किती महत्त्वाचे?
डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स अधिकाऱ्याचे काम युद्ध आणि दहशतवादविरोधी मोहिमा आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरू असलेल्या अभियानांची रणनीती तयार करण्याचे असते. लष्कराच्या तीन दलांमध्ये, तसेच गुप्तचर यंत्रणांमध्ये समन्वय ठेवण्याचे कामही हा अधिकारी बघतो.
वाचा >>लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
लष्करी संघर्ष, युद्ध सुरु होण्यापासून ते थांबवण्यापर्यंत घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक निर्णयामध्ये डीजीएमओची भूमिका निर्णायक असते. त्यामुळेच भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष थांबवण्यासाठी पहिली चर्चा डीजीएमओमध्येच झाली.