'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 08:41 IST2025-07-13T08:40:56+5:302025-07-13T08:41:19+5:30
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ऑपरेशन सिंदूरवेळी अणुहल्ल्याच्या तयारीबाबत विधान केले आहे.

'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले होते. त्यानंतर दोन्ही देशात तणाव सुरू होता. त्यावेळी पाकिस्तान अणु हल्ल्याची तयारी करत होता अशी माहिती समोर आली होती. दरम्यान, यावर आता स्वत: पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी प्रतिक्रिया दिली. शनिवारी त्यांनी सांगितले की त्यांचा अणुकार्यक्रम शांततापूर्ण उपक्रमांसाठी आणि स्वसंरक्षणासाठी आहे.
इस्लामाबादमध्ये पाकिस्तानी विद्यार्थ्यांना संबोधित करताना शरीफ यांनी ही टिप्पणी केली. त्यांनी अलीकडेच भारतासोबत चार दिवस चाललेल्या लष्करी संघर्षाची आठवणही करून दिली. शरीफ म्हणाले की, भारतीय लष्करी हल्ल्यात ५५ पाकिस्तानी मारले गेले.
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
अण्वस्त्रे वापरण्याच्या शक्यतेबद्दल विचारले असता, शरीफ म्हणाले, "पाकिस्तानचा अण्वस्त्र कार्यक्रम पूर्णपणे शांततापूर्ण हेतूंसाठी आणि राष्ट्रीय संरक्षणासाठी आहे, हल्ल्यासाठी नाही." २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ६ मे रोजी उशिरा ऑपरेशन सिंदूर सुरू केले, यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले.
भारताने 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे प्रत्युत्तर दिले
पहलगामच्या बैसरन खोऱ्यात ५ सशस्त्र दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची निर्घृण हत्या केली, त्यापैकी बहुतेक हिंदू पर्यटक होते. लष्कर-ए-तोयबाशी संबंधित 'द रेझिस्टन्स फ्रंट' ने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. दहशतवाद्यांनी हिंदू पुरुषांना लक्ष्य केले, यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. या घटनेनंतर देशात संतापाची लाट उसळली. भारताने पाकिस्तानवर दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचा आरोप केला. प्रत्युत्तर म्हणून, भारताने ६-७ मे २०२५ च्या रात्री 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले, याचे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या विधवांच्या सन्मानार्थ ठेवले. भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ले केले.या हल्ल्यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला.