मध्य पूर्वेत युद्ध सुरू होऊन अवघे १५ दिवस उलटले आहेत, परंतु या अल्प कालावधीतच जागतिक अर्थव्यवस्थेचे चक्र उलटे फिरू लागले आहे. युद्धविरामाची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने जगासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक विस्कळीत झाल्याने केवळ इंधनच नव्हे, तर अन्नसुरक्षा आणि जागतिक पुरवठा साखळीवरही गंभीर परिणाम झाला आहे.
कच्च्या तेलाच्या किंमती गगनाला भिडल्या
युद्धाच्या अवघ्या दोन आठवड्यांत कच्च्या तेलाच्या किमतीत ११ टक्क्यांची विक्रमी वाढ झाली आहे. शुक्रवारी जागतिक बाजारपेठेत ब्रेंट क्रूड १०३.१४ डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले. जगाचा २० टक्के तेल पुरवठा ज्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होतो, तिथली वाहतूक ९० टक्क्यांहून अधिक घटली आहे. गेल्या वर्षी जिथे १२२९ जहाजे जात होती, तिथे या मार्चमध्ये केवळ ७७ जहाजांनी धोका पत्करून प्रवास केला. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या ९० दिवसांच्या निकषाच्या तुलनेत, आफ्रिकेतील अनेक देशांकडे केवळ १५ ते २५ दिवसांचा तेल साठा उरला आहे. ऑस्ट्रेलियातही ३७ दिवसांचाच साठा उपलब्ध असल्याची माहिती आहे.
हवाई वाहतूक कोलमडली
हवाई क्षेत्रात या युद्धामुळे मोठी आणीबाणी निर्माण झाली आहे. मध्य पूर्वेतून जाणाऱ्या ९८,००० नियोजित उड्डाणांपैकी ५२,००० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. एअरलाईन्सनी 'फ्युअल सरचार्ज' वाढवल्याने आंतरराष्ट्रीय प्रवास २० ते ३० टक्क्यांनी महागला आहे. याचा थेट परिणाम पर्यटन आणि जागतिक व्यापार प्रतिनिधींच्या हालचालींवर झाला आहे.
अन्नसुरक्षा आणि खतांचे संकट
इराण हा युरिया आणि फॉस्फेट सारख्या खतांचा मोठा उत्पादक आहे. युद्धाने पुरवठा साखळी तोडल्याने जगासमोर खतांचे संकट उभे राहिले आहे. एकेकाळी निर्बंध लादलेल्या व्हेनेझुएलासमोर अमेरिकेला गुडघे टेकावे लागले आहेत. खतांची गरज भागवण्यासाठी अमेरिकेने व्हेनेझुएलाकडून आयात करण्याचे विशेष परवाने जारी केले आहेत. ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेतील शेतकऱ्यांना डिझेलच्या तुटवड्यामुळे शेतीची कामे थांबवावी लागली आहेत, ज्यामुळे पुढच्या हंगामात अन्नधान्याची टंचाई निर्माण होऊ शकते.
सागरी सुरक्षा आणि विमा दरात वाढ
गेल्या १५ दिवसांत किमान २० तेल टँकर आणि मालवाहू जहाजांवर हल्ले झाले आहेत. यामुळे सागरी विम्याचे दर गगनाला भिडले आहेत. अनेक कंपन्यांनी हा मार्ग पूर्णपणे टाळण्याचा निर्णय घेतल्याने मालवाहतुकीचा खर्च आणि वेळ दोन्ही वाढले आहेत.
भारतावर काय परिणाम होणार?
भारतासाठी ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे, कारण भारत आपल्या गरजेच्या ८० टक्के तेल आयात करतो. कच्च्या तेलाच्या किमती १०० डॉलरच्या वर राहिल्यास देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढू शकतात, ज्यामुळे मालवाहतूक महाग होऊन सर्वसामान्य गृहिणींचे बजेट कोलमडू शकते.
Web Summary : Mideast conflict's 15 days severely impact global economy, spiking oil prices by 11%. Air travel, food security threatened. India faces rising fuel costs.
Web Summary : मध्य पूर्व संघर्ष के 15 दिनों ने वैश्विक अर्थव्यवस्था को गंभीर रूप से प्रभावित किया, तेल की कीमतें 11% बढ़ीं। हवाई यात्रा, खाद्य सुरक्षा खतरे में। भारत में ईंधन की लागत बढ़ेगी।