मध्यपूर्वेतील युद्धात भारत निभावू शकतो मोठी भूमिका; भारताच्या कूटनीतीचे इराणकडून कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 13:48 IST2026-04-06T13:48:13+5:302026-04-06T13:48:38+5:30
US-Israel-Iran War: अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाला एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे.

मध्यपूर्वेतील युद्धात भारत निभावू शकतो मोठी भूमिका; भारताच्या कूटनीतीचे इराणकडून कौतुक
US-Israel-Iran War: अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाला एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. इतके दिवस होऊनही युद्धविराम किंवा होर्मुझ सामुद्रधुनी उघडण्याबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. पाकिस्तान, इजिप्त आणि तुर्किए हे देश मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र अजून अंतिम करारावर सहमती झालेली नाही. अशातच, इराणने भारताच्या कूटनीतीचे कौतुक केले आणि भारत मोठी भूमिका बजावू शकतो असे म्हटले आहे.
भारताच्या कूटनीतीचे इराणकडून कौतुक
इराणच्या सर्वोच्च नेत्यांचे भारतातील प्रतिनिधी अब्दुल माजिद हकीम इलाही यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाचे कौतुक करत म्हटले की, भारतीय कूटनीती अत्यंत संतुलित आणि प्रभावी आहे. या संघर्षात भारत मोठी भूमिका निभावू शकतो. हे कौतुक अशा वेळी करण्यात आला आहे, जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनी उघडण्यासाठी इराणला अंतिम मुदत दिल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी इराणचे राजदूत मोहम्मद फताली यांनीदेखील भारताच्या संतुलित परराष्ट्र धोरणामुळे तणाव कमी करण्यासाठी भारत प्रभावी भूमिका बजावू शकतो, असे म्हटले होते.
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा भारताशी संपर्क
इराणचे परराष्ट्र मंत्री सैयद अब्बास अराघची यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांच्याशी फोनवर चर्चा केली. इराणने आरोप केला की, अमेरिका आणि इस्त्रायल औद्योगिक प्रकल्प, रुग्णालये, शाळा, निवासी भाग आणि अणु केंद्रांवर हल्ले करत आहेत. इराणने स्पष्ट केले की, इराणची जनता आणि सेना देशाच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे तयार आहे. या संघर्षाचा परिणाम संपूर्ण जगाच्या स्थिरतेवर होऊ शकतो.
होर्मुझ सामुद्रधुनी बंद, जगभरात तेल दरवाढ...
फारसची खाडी आणि ओमानची खाडी यांच्यामधील अत्यंत महत्त्वाचा समुद्री मार्ग म्हणजे होर्मुझ सामुद्रधुनी. इराणने हा मार्ग बंद केल्यामुळे जागतिक तेल आणि गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. इराणने सांगितले आहे की, त्यांच्या मित्र देशांची जहाजे जाऊ शकतात, पण अमेरिका, इस्त्रायल आणि त्यांच्या सहयोगी देशांची जहाजे जातील. यामुळे जगभरात तेल आणि गॅसच्या किमती वाढल्या आहेत.
भारतावर काय परिणाम होऊ शकतो?
पश्चिम आशिया हा भारतासाठी तेल आणि गॅसचा प्रमुख स्रोत आहे. जर होर्मुझ सामुद्रधुनी दीर्घकाळ बंद राहिली तर, भारतातील पेट्रोल-डिझेल दर वाढू शकतात, खत (फर्टिलायझर) पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो, महागाई वाढू शकते आणि ऊर्जा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणून भारताने या संघर्षात युद्धविराम आणि होर्मुझ मार्ग खुला ठेवण्यासाठी राजनैतिक प्रयत्न सुरू केले आहेत.