पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 19:25 IST2026-04-12T19:25:16+5:302026-04-12T19:25:39+5:30
US-Iran-Israel: अमेरिका आणि इराणमध्ये 21 तास चाललेल्या बैठकीकडे अवघ्या जगाचे लक्ष लागून होते.

पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
US-Iran-Israel: अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तानात आयोजित उच्चस्तरीय चर्चा निष्फळ ठरली. सुमारे 21 तास चाललेल्या या चर्चेचा उद्देश युद्धविरामाला कायमस्वरूपी शांततेत रूपांतरित करणे हा होता. मात्र, राजनैतिक मतभेद आणि जटिल प्रादेशिक समीकरणांमुळे हा प्रयत्न अपयशी ठरला.
विशेष म्हणजे, 1979 च्या इराण क्रांतीनंतर आणि तेहरानमधील अमेरिकन दूतावास संकटानंतर ही दोन्ही देशांमधील सर्वात महत्त्वाची चर्चा मानली जात होती. या बैठकीत पाकिस्तान मध्यस्थीच्या भूमिकेत होता. मात्र, जागतिक तेलपुरवठा आणि मध्यपूर्वेतील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवरही एकमत होऊ शकले नाही.
अमेरिका-इराण अडिग भूमिकेमुळे तणाव
चर्चेदरम्यान अमेरिकेने इराणने युरेनियम संवर्धन कार्यक्रम तात्काळ थांबवावा आणि अण्वस्त्र न विकसित करण्याची हमी द्यावी, अशी मागणी केली. इराणने मात्र आपला अणु कार्यक्रम शांततापूर्ण असल्याचा पुनरुच्चार करत कोणत्याही बाह्य दबावाला नकार दिला. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हेन्स यांनी सांगितले की, इराण आमच्या अटींवर विचार करण्याच्या स्थितीतही आला नाही.
तणावपूर्ण वातावरणामुळे चर्चेला फटका
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चर्चेदरम्यान आक्रमक भूमिका घेतली. करार न झाल्यास पुन्हा हल्ले करण्याचा इशारा देण्यात आला. यामुळे इराणमध्ये अविश्वास वाढला आणि चर्चा दबावाखाली होत असल्याची भावना निर्माण झाली.
लेबनानमधील हल्ल्यांचा परिणाम
चर्चा सुरू असतानाच इस्रायलकडून लेबनानमध्ये लष्करी कारवाया सुरूच होत्या. इराणने या हल्ल्यांना थांबवण्याची मागणी केली होती. मात्र, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट केले की, अमेरिका–इराण युद्धविराम त्यांच्यावर लागू होत नाही. यामुळे चर्चेचे वातावरण आणखी बिघडले.
होर्मुझ सामुद्रधुनीवरून मतभेद
होर्मुझ हा या चर्चेतील सर्वात संवेदनशील मुद्दा ठरला. अमेरिकेला तेलपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी हा मार्ग खुला हवा होता, तर इराणने आर्थिक निर्बंध शिथिल करण्याच्या अटीवरच तो उघडण्याची भूमिका घेतली. या मुद्द्यावर कोणताही तडजोडीचा मार्ग न निघाल्याने चर्चा अडकली.
परस्पर अविश्वास ठरला निर्णायक
इराणचे वरिष्ठ नेते मोहम्मद बाघेर गालिबाफ यांनी सद्भावना आहे, पण विश्वास नाही, असे स्पष्ट केले होते. दोन्ही देशांमधील दीर्घकालीन तणावामुळे कोणत्याही प्रस्तावावर विश्वास ठेवणे कठीण झाले आहे. हीच गोष्ट चर्चेच्या अपयशाचे मुख्य कारण ठरली.
जागतिक परिणामांची शक्यता
या चर्चेच्या अपयशामुळे केवळ युद्धविराम धोक्यात आला नाही, तर संपूर्ण मध्यपूर्वेत अस्थिरतेचा धोका वाढला आहे. पाकिस्तानने मध्यस्थीचे प्रयत्न सुरू ठेवण्याची तयारी दर्शवली असली, तरी मूलभूत मुद्द्यांवर सहमती न झाल्यास तोडगा निघणे कठीण असल्याचे स्पष्ट झाले आहे.