पाकिस्तानात स्फोट घडवून ट्रेन हायजॅक; २० सैनिकांची हत्या, १८२ प्रवासी ओलिस
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 07:40 IST2025-03-12T07:40:13+5:302025-03-12T07:40:28+5:30
बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने रेल्वे घेतली ताब्यात, कारवाई केल्यास ओलिसांना ठार मारण्याची धमकी

पाकिस्तानात स्फोट घडवून ट्रेन हायजॅक; २० सैनिकांची हत्या, १८२ प्रवासी ओलिस
कराची:पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात बंडखोर बलूच लिबरेशन आर्मीने (बीएलए) एका रेल्वेवर ताबा मिळवत १८२ प्रवाशांना ओलिस ठेवले असून यादरम्यान झालेल्या चकमकीत रेल्वेत तैनात पाकिस्तानचे २० सैनिक मारले गेले असल्याचा दावा या संघटनेने केला आहे. दरम्यान, प्रवाशांच्या सुटकेसाठी पाकिस्तान बीएलएवर हवाई हल्ल्याच्या तयारीत असून असा हल्ला केलाच तर सर्व प्रवाशांची तासाभरात हत्या करू, असा इशारा बीएलएने दिला आहे.
९ डबे असलेली ही रेल्वे क्वेटाहून पेशावरला जात होती. यादरम्यान अशांत बलुचिस्तानमध्ये ९ डबे असलेली ही रेल्वे शस्त्रधारी बंडखोरांनी आठव्या क्रमांकाच्या बोगद्यात गोळीबार करीत अडवली. रेल्वे सूत्रांनुसार या वेळी रेल्वेत सुमारे ५०० प्रवासी होते. बलूच सरकारने या पार्श्वभूमीवर आपत्कालीन योजनेनुसार पावले उचलण्याचे निर्देश दिले असून संभाव्य परिस्थिती पाहता रुग्णालय परिसरात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. रुग्णवाहिका आणि सुरक्षा पथके घटनास्थळी रवाना करण्यात आली आहेत. पाकिस्तान सरकारने क्वेटा-पेशावर मार्गावर दीड महिना बंद असलेली रेल्वे सेवा अशातच पुन्हा सुरू केली होती.
मार्गावर एकूण १७ बोगदे
क्वेटा-पेशावर रेल्वे मार्गावर एकूण १७ बोगदे असून हा अत्यंत दुर्गम भाग असल्याने रेल्वेचा वेग नेहमी कमी असतो. यामुळे बंडखोरांना ही रेल्वे आठव्या क्रमांकाच्या बोगद्यात गोळीबार करून अडवता आली.
असा आहे घटनाक्रम
बलूच आर्मीचा प्रवक्ता जेयंद बलूच याच्यानुसार, बीएलएने पूर्वनियोजित योजनेनुसार रूळ उडवून देण्यात आले. त्यामुळे ही रेल्वे थांबवावी लागली. यानंतर संघटनेच्या सशस्त्र जवानांनी रेल्वेवर ताबा मिळवला.
बीएलएनुसार रेल्वेतील महिला व मुलांची सुटका करण्यात आली आहे. पाक सैनिकांनी हस्तक्षेपाचा प्रयत्न केला तेव्हा झालेल्या चकमकीत रेल्वेत तैनात २० सैनिक मारले गेले. बंडखोरांनी पाकचे एक ड्रोनही पाडले.
हल्ल्यानंतर काय घडले?
पाक लष्कराने जमिनीवरून गोळीबार व हवेतून बॉम्बवर्षाव केला; परंतु बलूच आर्मीने तो रोखला. पाकिस्तानचे मंत्री मोहसीन नकवी यांनी सांगितले की, निरपराध प्रवाशांवर गोळीबार करणाऱ्यांशी समझोता करण्यात येणार नाही. शेवटचा अतिरेकी ठार करेपर्यंत कारवाई सुरू राहील, असे पाक सुरक्षा दलांनी म्हटले आहे.
सरकारची चिंता वाढली
अपहरणाच्या घटनेनंतर बलुचिस्तान सरकारसोबत पाक सरकारची चिंता वाढली आहे. आपत्कालीन उपायोजना करण्यासोबतच कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व संस्थांना सक्रिय राहण्याचा आदेश दिला आहे. बीएलएच्या धमकीनंतरही लष्करी जवानांना सतर्क राहण्याचा आदेश दिला आहे. मात्र, या रेल्वेत महिला व मुलांसह लष्करी जवान, तसेच आयएसआयचे अधिकारी असल्यामुळे पाक सरकारला काळजीपूर्वक अभियान राबवणे गरजेचे आहे.
बीएलएवर पाकिस्तान, ब्रिटन व अमेरिकेत बंदी घालण्यात आलेली आहे, हे येथे उल्लेखनीय. बलुचिस्तान सरकारचे प्रवक्ते शाहिद रिंद यांनी सांगितले की, क्वेट्टाहून पेशावरकडे जाणाऱ्या जाफर एक्स्प्रेसवर जोरदार गोळीबार झाला. पेहरो कुनरी आणि गदलरदरम्यान हा प्रकार घडला.
रेल्वे अपहरण कुठे आणि कधी झाले?
भारतातील घटना
६ फेब्रुवारी २०१३ : मुंबई-हावडा मुख्य लाईनवर सिर्सा गेट ते कुम्हारी या दरम्यान जनशताब्दी एक्सप्रेसचे अपहरण करण्यात आले. उपेंद्र सिंग उर्फ काबरा याने तुरुंगातून पळून गेल्यानंतर ट्रेन अपहरणाची योजना आखली. याप्रकरणी ६ जणांना जन्मठेप झाली.
२००९ : जहाल नक्षलवादी नेता चक्रधर महातो याच्या आदेशावरून ३००-४०० नक्षल्यांनी २००९ मध्ये जंगलमहल येथे भुवनेश्वर-राजधानी एक्सप्रेसचे अपहरण करीत शेकडो प्रवाशांना ओलीस ठेवले. २० पोलिस अधिकारी आणि १५० सीआरपीएफ जवानांनी ऑपरेशन राबवून ट्रेनमधील सर्व कर्मचारी आणि ओलिसांची सुटका केली. या घटनेत कुणी जखमी झाले नाही.
जगात...
२-१४ डिसेंबर १९७५ : दक्षिण मोलुक्कनच्या सात दहशतवाद्यांनी विजस्टर, नेदरलँड्स येथे ५० प्रवाशांसह हूगेविन-बेलेन ट्रेनचे अपहरण केले आणि त्यांना बारा दिवस ओलिस ठेवले. तीन ओलिसांची हत्या केली.