"पहलगाम हल्ला अजून जग विसरलेलं नाही", भारताचा पाकिस्तानला कडक इशारा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 20:47 IST2025-06-26T20:44:47+5:302025-06-26T20:47:36+5:30
पाकिस्तान नेहमीच भारतावर खोटे आरोप करत असतो आणि आपला वाईट अजेंडा पुढे आणण्याचा प्रयत्न करतो, असे भारताने म्हटले आहे.

"पहलगाम हल्ला अजून जग विसरलेलं नाही", भारताचा पाकिस्तानला कडक इशारा!
संयुक्त राष्ट्रांमध्ये भारतानेपाकिस्तानला चांगलेच झापले आहे. पाकिस्तान नेहमीच भारतावर खोटे आरोप करत असतो आणि आपला वाईट अजेंडा पुढे आणण्याचा प्रयत्न करतो, असे भारताने म्हटले आहे. मुलांवरील अत्याचार आणि दहशतवादासारख्या गंभीर विषयांवरून लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तान असे करत असल्याचे भारताने म्हटले. भारताने यावेळी स्पष्टपणे सांगितले की, पहलगाममधील दहशतवादी हल्ला जग अजूनही विसरलेलं नाही.
पाकिस्तान मुलांवरील अत्याचारांवरून लक्ष विचलित करत आहे!
भारताचे प्रतिनिधी पी. हरीश यांनी सांगितले की, पाकिस्तान आपल्या देशात मुलांवर होणाऱ्या अत्याचारांवरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे. संयुक्त राष्ट्राच्या अहवालात हे स्पष्ट झाले आहे. तसेच, पाकिस्तान शेजारी देशातून (भारतात) होणाऱ्या दहशतवादावरूनही लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे.
पाकिस्तान संयुक्त राष्ट्राचा गैरवापर करतोय!
'मुले आणि सशस्त्र संघर्ष' या विषयावर संयुक्त राष्ट्रात चर्चा सुरू असताना, भारताने पाकिस्तानला चांगलेच सुनावले. पाकिस्तान या मंचाचा गैरवापर करत आहे आणि चुकीच्या गोष्टी बोलत आहे, असे भारताने म्हटले.
संयुक्त राष्ट्राच्या महासचिव अँटोनियो गुटेरेस यांच्या अहवालात म्हटले आहे की, पाकिस्तानमध्ये मुलांवर खूप अत्याचार होत आहेत. शाळा (विशेषतः मुलींच्या शाळा) आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले वाढले आहेत. तसेच, पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सीमेवर केलेल्या गोळीबार आणि हवाई हल्ल्यांमुळे अनेक अफगाणी मुले मरण पावली किंवा जखमी झाली आहेत, असेही या अहवालात नमूद आहे.
पहलगाम हल्ल्याची आठवण करून दिली
पाकिस्तान नेहमी भारताला बदनाम करण्याचा प्रयत्न करतो, असे भारताने म्हटले. त्यावेळी भारताने पाकिस्तानला पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची आठवण करून दिली. या हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी २६ निष्पाप लोकांची हत्या केली होती.
हरीश म्हणाले, "२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्याला जग विसरलेले नाही. सुरक्षा परिषदेनेही या हल्ल्याची निंदा केली होती आणि हल्लेखोरांना शिक्षा झाली पाहिजे असे म्हटले होते." यावरून भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला कठोर शब्दात सांगितले आहे की, त्यांनी दहशतवादाला पाठिंबा देणे बंद करावे.