तारिक रहमान यांचे १७ वर्षांनंतर धडाक्यात पुनरागमन, BNP ची जबरदस्त एन्ट्री; जमातचा खेळ बिघडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 01:31 IST2026-02-13T01:30:38+5:302026-02-13T01:31:32+5:30
महत्वचे म्हणजे, २०२४ मधील विद्यार्थी आंदोलनानंतर आणि शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर बांगलादेशात पहिल्यांदाच निवडणूक पार पडली. या निवडणुकीत शेख हसीना यांचा 'आवामी लीग' पक्ष मैदाना बाहेर होता.

तारिक रहमान यांचे १७ वर्षांनंतर धडाक्यात पुनरागमन, BNP ची जबरदस्त एन्ट्री; जमातचा खेळ बिघडला
बांगलादेशात पार पडलेल्या १३ व्या संसदीय निवडणुकीचे निकाल समोर येत आहे. या निवडणुकीच्या माध्यमाने बांगलादेश नॅशनल पार्टीचे (BNP) प्रमुख तारीक रहमान यांनी देसाच्या राजकारणात जबरदस्त पुनरागमन केले आहे. तब्बल १७ वर्षांनंतर मायदेशी परतलेल्या तारीक रहमान यांनी ढाका-१७ आणि बोगुरा-६ या दोन्ही मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला आहे. ते पंतप्रधान बनण्याच्या अगदी जवळ पोहोचले आहेत.
दणदणीत विजय -
बीएनपी मीडिया सेलचे सदस्य शायरुल कबीर खान यांनी ढाका ट्रिब्यूनला दिलेल्या माहितीनुसार, अनधिकृत निकालांमध्ये तारिक यांनी दोन्ही जागांवर विजय मिळवला आहे. ढाका-१७ मतदारसंघात तारीक रहमान यांनी जमात-ए-इस्लामीच्या एस.एम. खालिकुज्जमान यांचा पराभव केला. रहमान यांना ६०,२१५ मते मिळाली, तर प्रतिस्पर्ध्याला केवळ २४,५२४ मते मिळवता आली.
याच बरोबर, बोगुरा-६ या त्यांच्या पारंपरिक मतदारसंघात त्यांनी जमातच्या मोहम्मद अब्दुर रहमान यांचाही दुप्पटहून अधिक मतांनी पराभव केला. प्रोथोम आलोनुसार, २७ केंद्रांवरील आकडेवारीनुसार, तारिक यांना ३७,४६५ मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला १७,४२८ मते मिळाली. बोगुरामधील सर्व सात जागांवर बीएनपीचे उमेदवार आघाडीवर आहेत, यात तारिक सर्वात मजबूत स्थितीत आहे.
शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर बांगलादेशात पहिल्यांदाच निवडणूक -
महत्वचे म्हणजे, २०२४ मधील विद्यार्थी आंदोलनानंतर आणि शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर बांगलादेशात पहिल्यांदाच निवडणूक पार पडली. या निवडणुकीत शेख हसीना यांचा 'आवामी लीग' पक्ष मैदाना बाहेर होता. यामुळे मुख्य लढत बीएनपी आणि जमात-ए-इस्लामी यांच्यातच बघायला मिळाली. एकूण २९९ जागांवर मतदान झाले. एकाच्या मृत्यूमुळे एक जागा रद्द करण्यात आली होती. २९९ जागांपैकी बीएनपी ५० पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे, तर जमात १८ जागांवर पुढे आहे. या निवडणुकीत मतदानाचा टक्का सुमारे ४८ टक्के एवढा राहिला.
या मतदानासोबतच 'जुलै नॅशनल चार्टर'वर सार्वमत (रेफरेंडम) देखील घेण्यात आले. यामुळे, नव्या सरकारला संविधानात मोठे बदल करण्याचे अधिकारही मिळू शकतात.