श्रीलंका संकटात! तेल, गॅस, अन्नपदार्थांचा मोठा तुटवडा; भुकेने व्याकूळ लोक म्हणतात 'मृत्यू हाच पर्याय'
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 19:17 IST2022-05-20T19:09:53+5:302022-05-20T19:17:50+5:30
Sri Lanka Crisis : लोकांना एलपीजी गॅस आणि जीवनावश्यक खाद्यपदार्थ मिळत नसल्याची स्थिती आहे.

फोटो - news18 hindi
श्रीलंकेतील आर्थिक आणि अन्न संकटामुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. लोकांना एलपीजी गॅस आणि जीवनावश्यक खाद्यपदार्थ मिळत नसल्याची स्थिती आहे. याच दरम्यान, पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी दिलेल्या माहितीनुसार, देश सध्या अत्यंत वाईट परिस्थितीतून जात आहे आणि अन्न संकटाचा सामना करण्यासाठी सरकार पुढील प्लांटिंग सेशनसाठी पुरेसे खत खरेदी करेल.
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी केमिकल आणि खत उत्पादनांच्या आयातीवर बंदी घातली होती. त्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान होऊन अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला. सरकारला इतर देशांतून खाण्यापिण्याच्या वस्तुंची आयात करावी लागली आणि त्यामुळे महागाई वाढली.
पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी ट्विट केलं की, "मे आणि ऑगस्टच्या सीझनसाठी खत मिळू शकत नाही परंतु सप्टेंबर आणि मार्च सीझनसाठी खताची व्यवस्था करण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत". पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी लोकांना परिस्थितीचे गांभीर्य समजून घेण्याचे आणि स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, कोलंबोमध्ये फळे विकणाऱ्या एका महिलेने सांगितले की, "दोन महिन्यांत देशातील परिस्थिती कशी झाली हे माहीत नाही."
"देशात एका सिलिंडरची किंमत 5000 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तर एप्रिलमध्ये हा भाव 2675 रुपये होता. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर केवळ 200 सिलिंडरची डिलिव्हरी झाली. गॅस आणि अन्नाशिवाय आपण कसे जगू? शेवटी आपल्यापुढे एकच पर्याय असेल की आपण उपाशी मरू." श्रीलंकेत सध्या परकीय चलन, तेल, खाद्यपदार्थ आणि अत्यावश्यक औषधांचा प्रचंड तुटवडा आहे, त्यामुळे अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.