BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 15:35 IST2025-07-06T15:31:49+5:302025-07-06T15:35:02+5:30
ब्रिक्समधील देश जगाच्या लोकसंख्येच्या ४० टक्के आणि अर्थव्यवस्थेच्या ३० टक्के प्रतिनिधित्व करतात.

BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
PM Modi in Brazil for BRICS Summit: पंतप्रधान मोदी १७ व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी ब्राझीलमधील डी जानेरो येथे पोहोचले आहेत. जगातील पाच प्रमुख उदयोन्मुख अर्थव्यवस्थांनी ब्रिक्स नावाची संघटना स्थापन केली, ज्यात नंतर आणखी काही देशांनाही सामील करण्यात आले. ब्रिक्समध्ये सामील असलेले देश ११ देश जगाच्या अर्थव्यवस्थेच्या ३० टक्के आहेत. दरम्यान, ब्रिक्स म्हणजे काय आणि तेभारतासाठी का महत्त्वाचे आहे? हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
जगातील पाच प्रमुख उदयोन्मुख अर्थव्यवस्थांनी ब्रिक्स नावाची एक संघटना स्थापन केली आहे. संघटनेचे नाव ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका (ब्रिक्स) या पाच देशांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. या अनौपचारिक गटाचे नाव २००१ मध्ये विश्लेषक जिम ओ'नील यांनी ब्राझील, रशिया, भारत आणि चीन या पहिल्या अक्षरांना एकत्र करून ठेवले होते. २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेचाही या संघटनेत समावेश झाला, त्यानंतर या संघटनेचे नाव BRICS झाले.
आता इतके सदस्य देश BRICS मध्ये आहेत
२०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेचा समावेश झाल्यानंतर, २०२४ मध्ये BRICS चा पुन्हा एकदा विस्तार झाला. यामध्ये सौदी अरेबिया, इजिप्त, इराण, इथिओपिया आणि UAE यांनाही पूर्ण सदस्य बनवण्यात आले. त्यानंतर, २०२५ मध्ये इंडोनेशियादेखील या संघटनेचे पूर्ण सदस्य बनले. याशिवाय, मलेशिया, बोलिव्हिया, बेलारूस, नायजेरिया, क्युबा, थायलंड, कझाकिस्तान, युगांडा, उझबेकिस्तान आणि व्हिएतनाम सारखे देश सदस्य देश म्हणून या संघटनेशी जोडले गेले आहेत. पाकिस्तानने अद्याप अधिकृतपणे ब्रिक्समध्ये सामील होण्यासाठी अर्ज केलेला नसला तरी, त्यांनी या संघटनेचे सदस्य होण्याची इच्छा अनेक वेळा व्यक्त केली आहे.
Landed in Rio de Janeiro, Brazil where I will take part in the BRICS Summit and later go to their capital, Brasília, for a state visit on the invitation of President Lula. Hoping for a productive round of meetings and interactions during this visit.@LulaOficialpic.twitter.com/9LAw26gd4Q
— Narendra Modi (@narendramodi) July 5, 2025
भारतासाठी का महत्त्वाचे ?
भारताच्या जागतिक रणनीती आणि राजनैतिकतेसाठी ब्रिक्स खूप महत्वाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ब्रिक्स शिखर परिषदेत सहभाग हा राजनैतिक आणि आर्थिक रणनीतीला चालना देण्यासाठी खूप महत्वाचा आहे. पंतप्रधान मोदींची या शिखर परिषदेत उपस्थिती दर्शवते की, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची भूमिका वाढत आहे. भारत आर्थिक सहकार्य, जागतिक शांतता आणि राजनैतिक संतुलन राखण्यासाठी वचनबद्ध असल्याचेही सिद्ध होते. पुढील ब्रिक्स शिखर परिषद भारतात होणार असल्याने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती खूप महत्वाची आहे.
पाश्चात्य देशांचे वर्चस्व खोडून काढणे
विकासशील देशांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी आणि पाश्चात्य शक्तींच्या वर्चस्वाचा सामना करण्यासाठी ब्रिक्सची स्थापना करण्यात आली. संघटनेचे उद्दिष्ट पारदर्शक आणि समावेशक, भेदभावरहित व्यापार व्यवस्था विकसित करणे आहे. याशिवाय, ब्रिक्समध्ये डॉलर व्यतिरिक्त एक समान चलन देखील चर्चेत आहे. अशा परिस्थितीत, जागतिक स्तरावर आपली पोहोच मजबूत करण्यासाठी भारत ब्रिक्ससारख्या जागतिक व्यासपीठांवर महत्वाचा आहे.
आर्थिक राजनैतिकतेसाठी फायदेशीर
ब्रिक्समध्ये समाविष्ट असलेले देश जगाच्या लोकसंख्येच्या ४० टक्के आणि अर्थव्यवस्थेच्या ३० टक्के प्रतिनिधित्व करतात. अशा परिस्थितीत, भारत ब्रिक्सच्या माध्यमातून दक्षिणेकडील देशांशी आपले संबंध आणि द्विपक्षीय सहकार्य आणखी मजबूत करू शकतो. जागतिक स्तरावर उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये सहकार्य वाढविण्यासाठी या शिखर परिषदेत उपस्थिती खूप महत्वाची आहे.