पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 06:15 IST2025-10-06T06:10:18+5:302025-10-06T06:15:08+5:30
पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
इस्लामाबाद : आता युद्ध झाल्यास भारताला जोरदार उत्तर दिले जाईल व भारत त्यांच्याच लढाऊ विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबून जाईल, अशी पोकळ धमकी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली आहे.
भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला कोणत्याही चुकीच्या कृतीबाबत इशारा दिल्यानंतर पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी हे वक्तव्य केले आहे. एक्सवर त्यांनी म्हटले आहे की, भारतीय नेतृत्व आपला गमावलेला विश्वास मिळवण्यासाठीच बेजबाबदार आणि चिथावणीखोर वक्तव्ये करत आहे. भारत हेतूपुरस्सरपणे तणाव वाढवून नागरिकांचे लक्ष देशांतर्गत प्रश्नांवरून भटकवत आहे.
दोन्ही देश अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर : पाकिस्तान
पाकिस्तानचे म्हणणे आहे की, यावर्षी दोन्ही देश भारतामुळे अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. भारताने आमचे सडेतोड उत्तर विसरू नये.
भारताकडून खोटी विधाने केली जात आहेत. सारासार विचार न करता युद्धाला चिथावणी दिली जात आहे.
अनेक दशके पाकची चूक असल्याचे दाखवले. परंतु वास्तव हे आहे की, भारतच हिंसाचार व दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे.
काय म्हणाले होते भारताचे संरक्षणमंत्री, लष्करप्रमुख...
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह : भारताच्या सन्मानाची बाब असल्यास आम्ही कधीही समझोता करणार नाहीत. देशाची एकता व अखंडतेचे संरक्षण करण्यासाठी गरज पडल्यास कोणतीही सीमा पार करू शकतो.
लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी : भारताने ऑपरेशन सिंदूरमध्ये संयम दाखवला. परंतु आता काही झाल्यास भारत संयम दाखवणार नाही. आता त्यापुढील कारवाई करू.
हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह : ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकची १२ ते १३ विमाने जमीनदोस्त केली. भारतीय सैन्याने पाकचे पाच फायटर जेट व एक सी-१३० (ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट) नष्ट केले. ही विमाने पाकचे एअरबेस व हँगरमध्ये (विमानांची पार्किंग) उभी होती.