पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 06:34 IST2025-05-30T06:34:36+5:302025-05-30T06:34:59+5:30
पाकिस्तानच्या लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी भारतावर सकाळी ४:३० वाजता हल्ला करण्याची योजना आखली होती

पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
इस्लामाबाद : भारताने ९-१० मे दरम्यान ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी केलेल्या प्रहारामुळे पाकिस्तानचा नियोजित हल्ला फसला, अशी स्पष्ट कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी दिली. रावळपिंडीतील नूर खान विमानतळासह ११ ठिकाणी भारताने निशाणा साधला होता. पाकिस्तानने पश्चिम सीमेलगत भारतीय नागरी भागांवर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ही कारवाई केली.
ते म्हणाले की, पाकिस्तानच्या लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी भारतावर सकाळी ४:३० वाजता हल्ला करण्याची योजना आखली होती. मात्र, त्याआधीच भारताने ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने पाकिस्तानच्या अनेक लष्करी तळांवर आणि महत्वाच्या ठिकाणांवर हल्ला केला. शरीफ सध्या चार देशांच्या दौऱ्यावर असून भारत-पाक संघर्षाबाबत बुधवारी अझरबैजानच्या लाचिन शहरात दिलेल्या भाषणात त्यांनी ही धक्कादायक माहिती दिली.
अझरबैजान-तुर्कस्तान-पाकिस्तान अशा त्रिपक्षीय परिषदेत ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, भारताच्या 'आक्रमक भूमिके'मुळेच दोन्ही देशांतील संघर्ष वाढला. त्याने हल्ला केल्यावर आम्हाला देशाच्या संरक्षणासाठी कारवाई करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. (वृत्तसंस्था)
लढाईचे स्वरूपच बदलले
भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांचा वापर करत अत्यंत अचूकपणे पाकिस्तानच्या लष्करी तळांवर हल्ले केले.
भारतीय शहरांवर हल्ला पाकिस्तानकडून त्यानंतर ड्रोनद्वारे करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु भारतीय हवाई संरक्षण प्रणाली एस-४०० आणि आकाश यांनी ते ड्रोन पाडले. त्यानंतर भारतानेही पाकिस्तानवर ड्रोन हल्ले केले.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख मुनिर यांनी शांती प्रस्थापित होण्यासाठी शस्त्रसंधी करण्याचा सल्ला दिला. भारताशी संघर्ष अधिक न वाढवता तो थांबवावा असे माझेही मत होते, असे शरीफ म्हणाले.