इस्लामाबाद - नियंत्रण रेषेवर सतत शस्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या आणि काश्मीर खोऱ्यात कारवायांसाठी दहशतवाद्यांची जमवाजमव करणाऱ्या पाकिस्तानलाभारतीय लष्कराने आज जबरदस्त दणका दिल आहे. या कारवाईत 11 पाकिस्तानी सैनिका आणि 22 दहशतवादी ठार झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान, भारतीय लष्कराच्या या धडाकेबाज कारवाईमुळे पाकिस्तानचे लष्कर आणि सरकार सैरभैर झाले आहे. तसेच भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईचा जाब विचारण्यासाठी पाकिस्तानी सरकारने भारताचे पाकिस्तानमधील उपउच्चायुक्त गौरव अहलुवालिया यांना समन्स बजावले आहे.
दरम्यान, भारतीय लष्काराच्या कारवाईनंतर केंद्र सरकार अलर्टवर असून संरक्षण मंत्रालय सुद्धा याकडे लक्ष ठेवून आहे. या कारवाई संदर्भात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे लष्कर प्रमुख बिपीन रावत यांच्याशी संपर्क साधून माहिती घेत आहेत. आज सकाळी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील तांगधर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून लष्करी चौक्या आणि गावांना लक्ष्य करून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात तांगधर सेक्टरमध्ये तैनात असलेले दोन जवान शहीद झाले होते. पाकिस्तानच्या या नापाक कृत्यानंतर भारतीय लष्कराने प्रत्युत्तरा दाखल मोठी कारवाई केली आहे. भारतीय लष्कराच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये तोफांचा मारा करून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत. यावेळी जवानांनी दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केले. तसेच, उखळी तोफांचा मारा केला. यात दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त केले आहेत. या कारवाईमुळे दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय लष्कराने मोठा दणका दिला आहे. या कारवाईत कारवाईत 11 पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. तर 22 हून अधिक दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी कंठस्नान घातले आहे.