पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 23:33 IST2025-05-30T23:13:41+5:302025-05-30T23:33:12+5:30
पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध करताना, तालिबानने भारताबद्दल सहानुभूती व्यक्त केली होती.

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशामध्ये तणाव वाढला. भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले केले. यानंतर पाकिस्तान एकटा पडल्याचे दिसले. तालिबाननेही त्यावेळी भारताबद्दल सहानुभूती व्यक्त केली होती. दरम्यान, आता पाकिस्तान शेजारी असणाऱ्या देशांसोबत चांगले संबंध ठेवत असल्याचे दिसत आहे.
चीनमध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर आता पाकिस्तानने अफगाणिस्तानशी संबंध सुधारण्याची घोषणा केली आहे. ते तालिबान सरकारशी राजनैतिक संबंध सुधारणार असल्याची घोषणा पाकिस्तानने शुक्रवारी केली. यासोबतच पाकिस्तान अफगाणिस्तानात आपला राजदूतही नियुक्त करणार आहे.
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
२०२१ मध्ये जेव्हा तालिबानने काबूलवर कब्जा केला तेव्हा पाकिस्तानने शांतपणे त्याचे कौतुक केले. तालिबान सरकार त्यांच्या सुरक्षेच्या चिंता दूर करेल, अशी अपेक्षा पाकिस्तानला होती. पण त्याच्या उलट घडले. तालिबान राजवटीत, पाकिस्तानी सीमेवर तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान दहशतवाद्यांचे हल्ले अनेक पटींनी वाढले आहेत, यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. पाकिस्तानने तालिबानवर टीटीपी बंडखोरांना आश्रय दिल्याचा आरोप केला आहे आणि त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. तर अफगाणिस्तानने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
चीनने मध्यस्ती केली
चीनच्या मध्यस्थीने या महिन्यात बीजिंगमध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या बैठकीनंतर पुन्हा एकदा राजकीय संबंध पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील मतभेद सोडवण्यात चीनने महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे मानले जाते.
यापूर्वी, पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनीही एप्रिलमध्ये काबूलला भेट दिली होती. गेल्या तीन वर्षांत पाकिस्तानी मंत्र्यांचा हा पहिलाच अफगाणिस्तान दौरा होता.