'म्हणे, शत्रुत्वाच्या नादात भारताने मूर्खपणा केला!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 18:45 IST2019-02-26T18:41:47+5:302019-02-26T18:45:07+5:30

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला अखेर भारतीय हवाई दलानं घेतला आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये.

pakistan army accepted indian air force entered in pok | 'म्हणे, शत्रुत्वाच्या नादात भारताने मूर्खपणा केला!'

'म्हणे, शत्रुत्वाच्या नादात भारताने मूर्खपणा केला!'

इस्लामाबाद- पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला अखेर भारतीय हवाई दलानं घेतला आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये. हवाई दलानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ला चढवला. हवाई दलाच्या जवळपास 12 मिराज विमानांनी ही मोहीम फत्ते केली. त्यानंतर पाकिस्ताननं हा हल्ला झाल्याचं वृत्त फेटाळलं होतं. त्यानंतर आता पाकिस्तानी सेनेचे मेजर जनरल आसिफ गफूर यांच्या पत्रकार परिषद घेतली आहे. आमचं हवाई दलही सज्ज होतं. परंतु काळोख असल्याकारणानं आमचं हवाई दल कारवाई करू शकलं नाही. पण पुन्हा असा हमला झाल्यास आम्ही प्रत्युत्तर देऊ, असंही मेजर आसिफ गफूर म्हणाले आहेत. तसेच भारतानं शत्रुत्वाच्या नादात मूर्खपणा केल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.


तत्पूर्वी पाकिस्तानी सैन्याचे अधिकृत प्रवक्ते मेजर जनरल असिफ गफूर यांनी ट्विटरवरून भारतीय वायुसेनेच्या हल्ल्याची माहिती आज सकाळी दिली. मुझफ्फराबाद सेक्टरमधून भारतीय लढाऊ विमानांनी नियंत्रण रेषेचे उल्लंघन करून हल्ल्याचा प्रयत्न केला. परंतु कुठल्याही मालमत्तेचे नुकसान अथवा जीवितहानी झालेली नाही. पाकिस्तानी वैमानिकांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर भारतीय विमानांनी पळ काढला, अशा आशयाची पोस्ट आणि फोटो असिफ गफूर यांनी शेअर केले. त्यावर भारतीय ट्विटरवर युजर्स तुटून पडले आहेत. त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न पाकिस्तानी नागरिक करत असल्याने असिफ गफुर यांच्या अकाऊंटवरही भारत-पाक ट्विटरवर युद्ध रंगले आहे. मात्र तिथेही भारतीयांचाच विजय होत असल्याचे दिसत आहे.

 

Web Title: pakistan army accepted indian air force entered in pok