पाकिस्तानकडून १५४ भारतीयांना व्हिसा मंजूर, यामागचं कारणही आहे तितकंच खास, जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 23:10 IST2025-02-21T23:09:37+5:302025-02-21T23:10:36+5:30
India Pakistan Relationship: भारत आणि पाकिस्तान या दोन शेजारी देशांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून तणावाचे वातावरण आहे

पाकिस्तानकडून १५४ भारतीयांना व्हिसा मंजूर, यामागचं कारणही आहे तितकंच खास, जाणून घ्या
India Pakistan Relationship: भारत आणि पाकिस्तान या दोन शेजारी देशांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तानात सुरु असलेल्या क्रिकेट स्पर्धेसाठीही भारताने जाण्यास नकार दिल्यामुळे, भारताचे सर्व सामने दुबईत होणार आहेत. याशिवाय, राजकीय स्तरावर आणि नियंत्रण रेषेवरही फारसे चांगले वातावण नाही. असे असताना आज पाकिस्तानकडून काही भारतीयांना सुखद धक्का देण्यात आला. पाकिस्तानने शुक्रवारी १५४ भारतीयांना एका खास कारणासाठी व्हिसा मंजूर केल्याची माहिती दिली.
व्हिसा मंजूर केल्याचे कारण काय?
श्री कटास राज मंदिराला ( shree katas raj temple ) भेट देण्यासाठी १५४ भारतीयांना व्हिसा मंजूर करण्यात आल्याचे पाकिस्तानने सांगितले आहे. भारतातील पाकिस्तान उच्चायुक्तालयाने शुक्रवारी सोशल साइट X वरून ही माहिती दिली. पाकिस्तान उच्चायोगाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, २४ फेब्रुवारी ते २ मार्च २०२५ या कालावधीत श्री कटास राज मंदिरात तीर्थयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय यात्रेकरूंना व्हिसा देण्याबाबतचे निवेदन चार्ज डी'अफेअर्स साद अहमद वारैच यांनी एक्स वर पोस्ट केले आहे. त्यांनी तीर्थयात्री जाणाऱ्या यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांचा प्रवास आध्यात्मिकदृष्ट्या आनंददायी होईल, अशी आशाही व्यक्त केली आहे.
पाकिस्तान उच्चायोग नई दिल्ली ने 24 फरवरी से 2 मार्च 2025 के मध्य चकवाल जिले के पवित्र कटास राज मंदिरों में तीर्थ यात्रा के लिए 154 तीर्थ यात्रियों के एक दल को वीजे जारी किए हैं ।
— Pakistan High Commission India (@PakinIndia) February 21, 2025
पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, परस्पर समंजसपणा आणि आंतर-धार्मिक सलोखा वाढविण्याच्या धोरणानुसार अशा भेटी सुलभ करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला आहे आणि या उद्देशासाठी पाकिस्तान वचनबद्ध असल्याचेही म्हटले आहे. निवेदनात म्हटले आहे की, १९७४ च्या पाकिस्तान-भारत प्रोटोकॉलनुसार, दरवर्षी भारतातील हजारो हिंदू आणि शीख यात्रेकरू धार्मिक स्थळांच्या तीर्थयात्रेत विविध प्रसंगी आणि धार्मिक उत्सवांना उपस्थित राहण्यासाठी पाकिस्तानला भेट देतात. श्री कटास राज मंदिर किला कटास या नावाने देखील लोकप्रिय आहे. या मंदिराच्या संकुलात अनेक हिंदू मंदिरे देखील आहेत. या मंदिराचे संकुल कटास नावाच्या तलावाने वेढलेले आहे. हिंदू ते पवित्र मानतात. येथे येण्यासाठी व्हिसा मंजूर करण्यात आले आहेत.
श्री कटास राज मंदिराचे महत्त्व काय?
श्री कटास राज मंदिर परिसर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील पोतोहार पठार प्रदेशात आहे. पुराणांमध्ये असे म्हटले आहे की मंदिराचे तळे महादेवाच्या अश्रूंनी बनलेले आहे. जेव्हा शंकर भगवान त्यांची पत्नी सतीच्या मृत्युनंतर दुःखाने पृथ्वीवर भटकत होते, तेव्हा त्यांच्या डोळ्यातून आलेल्या अश्रूंमुळे हा तलाव तयार झाला. हे तलाव दोन कनाल आणि १५ मरळा क्षेत्रात पसरलेले आहे. त्याची कमाल खोली २० फूट आहे.
२००५ मध्ये भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी मंदिरांना भेट दिली होती. २००६ मध्ये, पाकिस्तान सरकारने मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू केले आणि २०१७ मध्ये आणखी सुधारणांची घोषणा केली.