"आता आपण स्वतंत्र, कुठल्याही परिस्थितीत हुकूमशाही...!'; बांगलादेशचे PM होण्याआधीच तारिक रहमान यांनी कुणाला दिला इशारा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 18:18 IST2026-02-14T18:17:43+5:302026-02-14T18:18:26+5:30
तब्बल १७ वर्षांच्या निर्वासनानंतर तारिक रहमान हे लंडनहून बांगलादेशात परतले आहेत. बांगलादेशात पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर, ते बांगलादेशच्या नव्या चहऱ्याच्या रुपात समोर आले आहेत.

"आता आपण स्वतंत्र, कुठल्याही परिस्थितीत हुकूमशाही...!'; बांगलादेशचे PM होण्याआधीच तारिक रहमान यांनी कुणाला दिला इशारा?
बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीत 'बांगलादेश नॅशनल पार्टी'ने (BNP) अभूतपूर्व विजय मिळवला आहे. या ऐतिहासिक विजयानंतर बीएनपीचे अध्यक्ष तारिक रहमान यांनी शनिवारी देशातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी देशातील जनतेला लोकशाहीच्या रक्षणासाठी ऐक्याचे आवाहन केले. तसेच, हा विजय लोकशाहीसाठी बलिदान देणाऱ्यांना समर्पित असल्याचेही ते म्हणाले.
"आपण एकजूट रहायला हवे, जेणेकरून..." -
तारिक रहमान म्हणाले, "हा बांगलादेश आणि लोकशाहीचा विजय आहे. आजपासून आपण सर्वजण स्वतंत्र आहोत आणि खऱ्या अर्थाने अधिकारांची पुनर्स्थापना झाली आहे. १५ वर्षांहून अधिक काळानंतर देशात प्रत्यक्ष मतदानाद्वारे संसद आणि सरकारची स्थापना होत आहे. आपण एकजूट रहायला हवे, जेणेकरून कुठल्याही परिस्थितीत वाईट शक्ती पुन्हा हुकूमशाही प्रस्थापित करू शकणार नाही आणि राष्ट्र कोणाच्याही अधीन होणार नाही."
"कुठल्याही परिस्थितीत कुणावरही अन्याय होता कामा नये" -
'ढाका ट्रिब्यून'ने दिलेल्या वृत्तानुसार, रहमान यांनी एका सुरक्षित बांगलादेशच्या निर्मितीसाठी सर्वांच्या सहकार्याची गरज व्यक्त केली. "देशाच्या पुनर्निर्माणात सर्वांनी जबाबदारीने काम करावे लागेल. कुठल्याही परिस्थितीत कुणावरही अन्याय होता कामा नये आणि कायदा-सुव्यवस्था कोणत्याही परिस्थितीत राखली जावी," असेही ते म्हणाले.
पुढील तीन दिवसांत बांगलादेशला मिळू शकते नवे सरकार -
अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांचे प्रेस सचिव शफीकुल आलम यांनी म्हटले आहे की, नव्या सरकारचा शपथविधी लवकरच पार पडेल. पुढील तीन दिवसांत बांगलादेशला नवीन सरकार मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, तब्बल १७ वर्षांच्या निर्वासनानंतर तारिक रहमान हे लंडनहून बांगलादेशात परतले आहेत. बांगलादेशात पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर, ते बांगलादेशच्या नव्या चहऱ्याच्या रुपात समोर आले आहेत.