विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 06:48 IST2025-06-18T06:45:58+5:302025-06-18T06:48:58+5:30

Nigeria Water Crisis: नायजेरिया हा आफ्रिकेतला एक देश, संघर्ष आणि अस्वस्थता कायमच या देशाच्या नशिबी पुजलेली.

Nigeria Water Crisis, 10000 people killed | विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!

विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!

नायजेरिया हा आफ्रिकेतला एक देश, संघर्ष आणि अस्वस्थता कायमच या देशाच्या नशिबी पुजलेली. याच देशाच्या उत्तर-मध्य भागातील बेन्यू राज्यातील येलेवाटा गावाचा परिसर. तीन दिवसांपूर्वीचीच गोष्ट. काही बंदूकधारी आले. त्यांनी गावाला वेढा घातला. घरांना बाहेरून कड्या लावल्या. त्यांना घरातच कोंडून घातलं आणि त्यांच्या घरांना बाहेरून आग लावून दिली. जे लोक बाहेर होते, त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात शंभरापेक्षा अधिक नागरिक ठार झाले. जखमींची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. बऱ्याच मृतदेहांची इतकी विटंबना झाली आहे की ते ओळखूही येण्याच्या पलीकडे आहेत. अनेक जण तर अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचं काय झालं हे अजून कोणालाच कळलेलं नाही. चित्रपटात शोभेल अशी ही घटना आणि इतकं भयानक क्रौर्य!

ह्यूमन राइट्स ग्रुप अॅम्नेस्टी इंटरनॅशनलनं यासंदर्भात तीव्र खेद आणि चिंता व्यक्त करताना म्हटलं आहे, मरण इतकं स्वस्त झालं आहे का, की कोणीही उठावं, कोणालाही मारावं आणि त्यासंदर्भात कोणालाच काही करता येऊ नये? असे प्रकार आता बंद व्हायला हवेत आणि त्या-त्या देशाच्या सरकारांनी याकडे गांभीर्यानं पाहायला हवं. कशामुळे झाल्यात या हत्या? काय होतं त्याचं कारण? अतिरेक्यांनी या हत्या घडवून आणल्या का? या प्रश्नाचं उत्तर त्याहीपेक्षा भयानक आहे. इतक्या लोकांना का ठार मारण्यात आलं, याचं अधिकृत कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नसलं तरी पाणी आणि जमीन हे त्याचं मुख्य कारण आहे. आपल्या वाट्याचं पाणी आणि जमीन कोणी बळकावू नये; तसंच जर कोणी बळकावत असेल तर त्याचा लगेच नायनाट केला पाहिजे, ही तेथील लोकांची मानसिकता झाली आहे. त्यामुळे आपल्या वाटेत जो कोणी येईल त्याला संपवायचं हेच धोरण. त्या जोडीला जातीय आणि धार्मिक अस्मिता. या कारणांमुळे हा संघर्ष आणखीच टोकदार झाला आहे आणि माणसं एकमेकांच्या जिवावर उठली आहेत.

या संघर्षात आहेत मुख्यतः दोन गट. एक गट आहे गुराखी/मेंढपाळांचा, तर दुसरा गट आहे शेतकऱ्यांचा. गुराख्यांना आपल्या गुराढोरांना चारण्यासाठी जमिनीची, गवताची आवश्यकता, तर शेतकऱ्यांना शेतीसाठी. शेतकऱ्यांचा आरोप आहे की हे गुराखी त्यांची गुरंढोरं आमच्या शेतात चरण्यासाठी सोडून देतात आणि आमच्या शेतीचं नुकसान करतात, तर गुराख्यांचं म्हणणं आहे, या सगळ्याच जमिनी चराऊ आहेत आणि त्यावर आमचाच हक्क आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर पाच वर्षांनी १९६५ मध्ये पहिला कायदा लागू झाल्यानंतर या जमिनी आम्हाला मिळाल्या होत्या. तिथल्या पाण्यावरही आमचाच हक्क आहे, म्हणून दोन्ही गटांत गेल्या काही वर्षापासून रक्तरंजित संघर्ष सुरू आहे.

गेल्याच महिन्यात ग्वेर वेस्ट जिल्ह्यात संशयित गुराख्यांनी ४२ लोकांना गोळ्या घालून ठार केलं. त्याआधी एप्रिल महिन्यात किमान ४० लोकांना अतिशय क्रूर पद्धतीनं कंठस्नान घालण्यात आलं. याच परिसरात २०१९पासून आतापर्यंत पाचशे लोकांना ठार करण्यात आलं आहे. गेल्या फक्त दोन वर्षात नायजेरियात १० हजारपेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सततच्या संघर्षामुळे आतापर्यंत सुमारे २२ लाख लोकांनी स्थलांतर केलं आहे.

Web Title: Nigeria Water Crisis, 10000 people killed